Poladpur Rain Update
पोलादपूर : यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत असताना मंगळवारी (दि.२३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलादपूर शहरासह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून वातावरणातही सुखद गारवा निर्माण झाला आहे.
दिवसभर रिमझिम सुरू असलेल्या पावसाने सायंकाळी अचानक जोर धरल्याने रस्ते व परिसर जलमय झाले. वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान उभारण्यात आलेल्या पोलादपूर शहरातील प्रभातनगर अंडरपास परिसरात पुन्हा एकदा नियोजनातील त्रुटी उघड झाल्या आहेत. अंडरपासच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याने महामार्गावरील पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे.
पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्यामुळे भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांचा फटका सर्व्हिस रोडवरील दुचाकीस्वार, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून महामार्ग प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
नुकतीच पावसाळ्याची सुरुवात झाली असताना ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी चार महिन्यांच्या पावसाळ्यात या भागात आणखी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.