अलिबाग : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असणार्या राज्य परिवहन मंडळ अर्थात सर्वसामान्यांची एसटीवर यावेळी श्रीगणेशाची कृपा झाली आहे. गेल्या पाच दिवसात गणेशोत्सवासाठी पाच हजार एसटी बसेस धावल्या असून, यामधून सुमारे अडीच हजार गणेशभक्तांना सुखरुपपणे त्यांच्या गावी पोहोचले आहेत.रायगडमधून कोकणासाठी सुमारे 200 बसेस मुंबई विभागाकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे रायगडच्या विभागालाही त्याचा फायदा झाला आहे.
गणेशोत्सव म्हटलं की कोकणात एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. गणेशोत्सव आणि कोकण हे एक वेगळं समीकरण पाहायला मिळतं. आता गणेशोत्सवाच्या काळात अनेक चाकरमानी कोकणात जात-येत असतात. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी लालपरीला म्हणजे एसटीला प्राधान्य दिलं आहे. गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघरसह आदी शहरातून जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आप-आपल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या 5 दिवसांत पोहोचले आहेत.
तब्बल 5000 पेक्षा जास्त बसेसद्वारे एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करून एक नवा विक्रम केला आहे. 3 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये कर्मचार्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणीवर मात करत एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल 5000 बसेसद्वारे अडीच लाख पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे.
गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 3 ते 8 सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात 100 बसेस तैनात ठेवण्यात आल्या होत्या.- अभिजीत भोसले, परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी
यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले 10 हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात किरकोळ अपघात वगळता एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली. या बद्दल महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, आता 12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार्या परतीच्या वाहतुकीसाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागातील आगारातून गट आरक्षण व व्यक्तिगत आरक्षणाला देखील चांगला प्रतिसाद मिळाले.