गेले पंधरा दिवस घराघरात जणू चैतन्यच निर्माण झाले होते. गणेशोत्सवानिमित्त अवघ्या तळा तालुक्यातील खेडी माणसांनी फुलून गेली होती. बंद दरवाजे सताड उघडे रहात होते. माणसांची वर्दळ या घरातून त्या घरात सुरु राहिली होती. गोडाधोडाच्या पदार्थांचे मधूर सुवास अवघ्या गल्लीत पसरत होता. विसर्जनानंतर करण्यात आलेल्या चमचमीत मटण रस्स्याचा सुवासही असाच भूक चाळविणारा ठरत होता. हजारो चाकरमान्यांमुळे बंद असणारी घरेही बोलकी वाटत होती. पण विसर्जन होताच हीच बोलकी घरे अबोल झाली आणि पुन्हा एकदा या घरांना टाळे लागले. अशी स्थिती तळा तालुक्यातील प्रत्येक गावागावात झाली आहे.
तळा तालुक्यात सण-उत्सवात ग्रामीण भाग ते शहरात गणेशोत्सव व होळी उत्सवासाठी चाकरमानी मोठ्याप्रमाणात गावाकडे येत असतात त्यातच गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण व उत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. या गणेशोत्सवात गावागावात चाकरमानी मंडळी आपल्या कुटुंबासह गावात आली होती सारा गाव माणसांनी फुलून गेला होता. सर्वघरे प्रकाशमय झाली होती. सर्वाच्या आनंदाला भरते आल्याचे एक आगळेवेगळे आनंदीमय चित्र पहावयास मिळत होते. सर्व घरे जणू काही आनंदाने बोलकी झाली होती.
शेजारी पाजारी मोठ्या आनंदाने एकमेकांकडे जाऊन आनंदाने विचार व्यक्त करताना दिसत होती. सार्या गावात कोठे ढोलकीचा आवाज तर कोठे भजनाचा आवाज, तर कोठे बाल्या नाच, तर कोठे सत्कार समारंभ, तर कोठे गावविकासाठी सभा, तर कोठे गावचा विकास आराखडा नियोजन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन होत होते. सार्यागावाज माणसांची रेलचेल होती मात्र आता गणेशोत्सव संपला आणि चाकरमानी मंडळी पुन्हा आपल्या कामावर रूजू होण्यासाठी मुंबई पुणेकडे परतीच्या प्रवासाला लागून गावे रिकामी झाली. फुललेल्या गावात आता शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
आता राहीली ती फक्त वयोवृद्ध माणसे व अनेक बंद घरे आता गावांतील येणारा आवाज, सर्व काही शांत झाला आहे. हिच माणसे येथे राहीली तर. परंतु येथे राहण्याच्या दृष्टीने एखादा उद्योगधंदा, व्यवसाय असायला पाहिजे, हाताला काम मिळायला पाहिजे तरच राहता येईल या सार्याचा विचार करता तळा तालुक्यात कोणतातरी उद्योगधंदा अथवा कारखाना होणे आवश्यक आहे. उद्योगधंदे येथे निर्माण झाले तर येथील चाकरमानी गावाकडे राहतील व हारवलेले गावपण पुन्हा गावाला मिळून गणेशोत्सवासारखीच गावे नियमित आनंदात राहातील. प्रकाशमय फुललेली दिसतील. असे वयोवृध्द म्हणत आहेत.