पोलादपूर: कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या आंबेनळी घाटातून पावसाळ्यात प्रवास करणे अत्यंत जिकीरीचे बनले आहे. सन २०२१ च्या नैसर्गिक आपत्ती नंतर घाटमार्गवर दरडीचे सातत्यपूर्ण कार्य राहिले असून यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहेत.
जुलैच्या नैसर्गिक आपत्ती मध्ये आंबेनळी घाटात पाच ते सहा वेळा दरड कोसळल्याने घाट बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे घाटमार्गाची वाट खडतर झाल्याचे दिसत आहे.हा मार्ग पावसाळ्यातही सुरू राहण्यासाठी पुरेशा सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असून,रायगड हद्दीत डोंगरावर लोखंडी जाळ्या बसवल्या तर काहीप्रमाणात सुरक्षितपणे प्रवास करणे शक्य होणार आहे.
कोणतेही मोठी दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने अवजड वाहनांसाठी ३१ जुलै पर्यत मार्ग बंद ठेवला होता , मात्र १ ऑगस्टपासून वाहतूक सुरू करणार का मार्ग चालू आहे का, याबाबत सोशल मोडियावर संदेशाची देवाण घेवाण सुरू होती मात्र प्रशासनाने नव्याने आदेश न काढल्याने सदरचा घाट अद्याप अवजड माल वाहतूक सह एसटी ट्रॅव्हलबस ,मिनीबसेस चारचाकी वाहनांसाठी बंद असल्याचे दिसून आले आहे दरड कोसळल्याने ठिकठिकाणी माती व दगड बाजूला केलेलं दिसून येत आहे.
या मार्गावर दरडग्रस्त भागात महामार्गासह राज्यमार्ग विभागाने लोखंडी जाळीसह संरक्षक भिंत उभारणे गरजेचे बनले आहे. त्याच प्रमाणे दरी लगत बाधित झालेले कठडे नव्याने दर्जेदार करणे गरजेचे आहे.
पोलादपूर तालुक्यातील जाणारे मुख्य दोन घाट मार्ग आहेत पोलादपूर वाई सुरुर राज्य मार्ग वरील आंबेनळी तर दुसरा मुंबई गोवा महामार्ग वरील कशेडी घाट होय.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबेनळी घाटात दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्याने जुलै महिन्यात शेवटच्या टप्यात संपूर्णने घाट मार्ग बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले होते. या मार्गावर जेसीबीसह इतर यंत्रणा ठेवाव्या लागत असल्याने लाखो रुपये खर्ची पडत असल्याने घाटमार्गवर ठोस उपाययोजना क्रमप्राप्त बनले आहेत.
पोलादपूर -वाई - महाबळेश्वर राज्यमार्ग हा वरील अवघड वळणांचा सह्याद्रीच्या डोगररांगातून जाणारा खोलदऱ्या, धोकादायक कडे यातून सापासारखा नागमोडी वळणे घेत माथ्यापर्यंत जाणारा घाट म्हणजे आंबेनळी घाट. पावसाळ्यात घाटातील सौंदर्य पाहाण्यासाठी पर्यटक आवर्जून पोलादपूर ते महाबळेश्वर,वाई, सुरूर या राज्यमार्गाने प्रवास करतात.
मात्र अलीकडच्या वर्षामध्ये पावसाळ्यात दरडी कोसण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. , सातारा वाईला जाण्यासाठी प्रवाशांनी या घाट रस्त्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. सध्य स्थितीत तुरळक लहान वाहने दुचाकी या घाटमार्गाचा अवलब करताना दिसून येत आहेत. हा घाटमार्ग साडे चोवीस किलोमीटरचा असून रायगड आणि पश्चिम घाटमाथावरील जिल्हयांना जोडणारा मार्ग म्हणून ओळखला जातो.
या घाटाची सर्वसाधारण उंची २०५१ फूट इतकी आहे. गेल्या काही वर्षापासून या घाटात पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात दरडी कोसळत आहेत. वेळोवेळी दरडी हटविण्यासाठी घाट बंद ठेवण्यात येत असतो. पावसाळ्यात घाटाची दुरूस्ती करता येत नाही. कशेडी घाट मधील प्रवास सुखकर होत आहे महामार्गचे रुंदीकरण सह भुयारी मार्गिके मधून वाहतूक सुरक्षित व सुसाट होत आहे.
दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च
पावसाळ्यात आंबेनळी घाट सुरळीत व सुरक्षित प्रवासाचा राहत नाही असे कित्येक वेळा घडले आहे. त्यामुळे शासनाकडून या घाटाला महत्व का दिले जात आहे याचे तालुक्यातील दोन्ही जिल्ह्यातील जनतेला आश्चर्य वाटत आहे.
पावसाळ्यात दरडी कोसळून झालेल्या घाटग्रस्त रस्त्याच्या दुरुस्तीकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळोवेळी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र त्याच घाट रस्त्याच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात कशा ? असा प्रश्न स्थानिक जनता आणि नियमित ये- जा करणाऱ्या वाहनचालकाकडून उपस्थित होत आहे.