श्रीवर्धन किनारपट्टी Pudhari News Network
रायगड

Fishermen of Raigad | उत्तरेकडील वादळामुळे मच्छिमारांची परिस्थिती गंभीर

मच्छिमारांचे भवितव्य धोक्यात; आणखी किती संकटांना सामोरे जायचे; मच्छिमार बांधव चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

श्रीवर्धन : भारत चोगले

दक्षिण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार सध्या अतिशय कठीण परिस्थितीत अडकले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दक्षिणेकडील खराब हवामानामुळे मच्छिमारांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला होता.

उत्तरेकडील खराब हवामानामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. समुद्रातील वादळे, अवकाळी पाऊस आणि वार्‍यांच्या तीव्रतेमुळे मच्छिमारांच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे. या अडचणींमुळे मच्छिमारांच्या कुटुंबांना नोकर्‍या, अन्न आणि आर्थिक संसाधनांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.

समुद्रात होणार्‍या नुकसानामुळे बोटींचे नुकसान, जाळे फाटणे आणि अन्य सामानांची हानी झाली आहे. यामुळे मच्छिमारांचे कामकाज ठप्प झाले असून, मोठ्या प्रमाणावर खर्च वाढला आहे. समुद्राच्या बदलत्या स्थितीमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडला आहे, ज्यामुळे त्यांना रोजगार मिळवणे जवळपास अशक्य होऊन गेले आहे.

या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. मच्छिमारांना बोटी चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, बर्फ, ऑईल, आणि खलाशी वर्गाच्या पगाराची अडचण फारच गंभीर झाली आहे. यावर शासनाने त्वरित दखल घेऊन आर्थिक मदतीचा एक विशेष पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या व्यवसायाच्या संरक्षणासाठी तत्काळ उपाय योजले नाहीत, तर मच्छिमारांचे भवितव्य धोक्यात येईल.

श्रीवर्धन, मुळगाव, बागमांडला, शेखाडी, दिवेआगर, आदगाव, दिघी, कुडगाव आणि अन्य किनारपट्टी भागात मच्छिमारांची बोटी नांगरली आहेत, आणि त्या भागांमध्ये शुकशुकाट पसरलेला आहे. मच्छिमारांना समुद्रात मासे मिळवणे जवळपास अशक्य झाले आहे, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाचा संपूर्ण पाया कोलमडला आहे.

या परिस्थितीला तोंड देत, मच्छिमारांसाठी आता जीवन खूपच कठीण होऊन गेले आहे. त्यांच्या कुटुंबांना उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे, आणि त्यांचे अस्तित्व संकटग्रस्त होईल. शासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर कोकणातील मच्छिमारांचे भविष्य संकटात येईल.

मच्छिमारांचा व्यवसाय केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर कोकणाच्या अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वपूर्ण आहे. सरकारने तातडीने त्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा, मच्छिमारांच्या कुटुंबांना असहायतेचे संकट जास्त वाढेल.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मच्छिमारी ठप्प झाली आहे. बोटी किनार्‍यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे मच्छिमारांची उपासमार सुरू आहे. मच्छिमारीवर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यावसायिक व रोजगार धोक्यात आले आहेत. आता उत्तरेकडील खराब हवामानामुळे मच्छिमारांचे कंबरडेच मोडले आहे. आर्थिक संकटात सापडलेले मच्छिमार पुन्हा एकदा कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत. शासनाने तातडीने विशेष पॅकेज जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे.
इम्तिंयाज कोकाटे, चेअरमन, कोकण मच्छिमार संस्था
गेल्या तीन महिन्यांपासून मच्छिमार दक्षिणेकडील खराब हवामानामुळे समुद्रात जाऊ शकले नाहीत आणि बोटी बंदरात नांगरून ठेवल्या होत्या. आता उत्तरेकडील खराब हवामानामुळे त्यांचे व्यवसाय पुन्हा ठप्प झाले आहेत. सण जवळ आले असून, व्यापारी आणि बँकेचे कर्ज वाढतच आहेत. मच्छिमारांना संसार चालवण्यास अडचणी येत आहेत. आर्थिक संकटात सापडलेले मच्छिमार आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करत आहेत. शासनाने तातडीने एक आर्थिक पॅकेज जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे.
रामप्रसाद वाघे, माजी. चेअरमन, श्रीकृष्ण मच्छिमार, संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT