संदेश उतेकर
सुधागड शहर: विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून पोषण आहार योजना राबवते. मात्र, सुधागड तालुक्यात चक्क मुदत संपलेला आहार पुरवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे, अशी खळबळजनक वस्तुस्थिती ही भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस व संघटन मंत्री भाजपा नेते सतिश धारप यांनी अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली आहे. या गंभीर प्रकारामुळे शिक्षण विभाग आणि आहार पुरवठादार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजिप शाळा वावलोळी येथे रायगड जिल्हा सरचिटणीस व संघटन मंत्री भाजपा नेते सतीश धारप व त्यांचे काही सहकारी यांना ही गंभीर बाब समजताच त्यांनी शाळेला भेट दिली. व त्यांना मुदत संपले पोषण आहार तेथे आढळून आले आणि मुदत संपलेले पोषण आहार घेऊन पाली पंचायत समिती येथे जाऊन गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांची भेट त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असाल कुठल्याही अधिकारी व पोषण आहार पुरवठादाराला सोडलं जाणार नाही अशी ताकीद देण्यात आली व तत्काळ चौकशी सुरू करावी असे निर्देश देण्यात आले. तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्रत्येक शाळेला भेट देऊन तेथील पोषण आहाराची पाहणी करून मुदत संपले आहार आढळून आल्यास तत्काळ शिक्षण विभागाला निर्दशनास आणून द्यावे. मुदत संपलेला आहार विद्यार्थ्यांना देणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
यावेळी नगराध्यक्ष पराग मेहता,ालाप मेहता, श्रीकांत ठोंबरे, दादा घोसाळकर , रोहन दगडे, यांसह तालुक्यातील अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा आक्रमक: अधिकाऱ्यांवर ताशेरे
या प्रकरणाची दखल घेत भाजपा नेते सतिश धारप यांनी गट शिक्षण अधिकारी व गट विकास अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना चांगलेच खडसावले.“एवढी मोठी गंभीर बाब समोर असताना शिक्षण विभाग झोपला आहे का? सरकार दर्जेदार आहारासाठी निधी देते, मग अशा निकृष्ट आणि एक्सपायर झालेल्या मालाचा पुरवठा होतोच कसा?“ असा रोखठोक सवाल धारप यांनी उपस्थित केला.
तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. भविष्यात प्रत्येक मालाची मुदत तपासूनच तो विद्यार्थ्यांना दिला जावा, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.