कमलाकर होवाळ
माणगाव: उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात कोकणच्या दिशेने धाव घेणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक हृदयस्पर्शी पाऊल उचलले आहे. दिवा-चिपळूण या व्यस्त मार्गावर विशेष मेमू गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, ही सेवा महाराष्ट्र दिनाच्या (1 मे) शुभ मुहूर्तावर सुरू होणार आहे.
कोकणवासीयांच्या अनेक वर्षांच्या मागणीला दुजा भाव न करता रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळक दिसून येत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवासाला मेमूचा ‘बूस्टर’ मिळणार असल्याने प्रवासी नागरिक पर्यटक आणि बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर आनंदाच कारंजे फुलले आहेत.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावोगावी, नातेवाईकांकडे किंवा निसर्गसुंदर किनारपट्टीवर जाणाऱ्या कुटुंबांना आता गर्दीचा त्रास सहन करावा लागणार नाही. 1 मे ते 7 जून : दररोज 36 सेवा, विस्तृत स्टॉपेजसह विशेष मेमू गाड्या 1 मे 2026 ते 7 जून 2026 या कालावधीत धावणार असून, दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारला एकूण 36 सेवा उपलब्ध होणार आहेत.
दिवा ते चिपळूण मेमू गाडी रात्री 11:25 वाजता दिव्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता चिपळूणला पोहोचेल. प्रत्यावर्ती चिपळूण ते दिवा गाडी दुपारी 3:30 वाजता चिपळूणहून निघून रात्री 11:10 वाजता दिव्याला हजेरी लावेल.
या गाड्या निळजे, तळोजा पंचंद, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जांभिवली, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे, वांगणी, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि आंजनी अशा 23 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. यामुळे शहरी, सहशहरी आणि ग्रामीण प्रवाशांना समान लाभ मिळेल.
रेल्वे प्रशासनाने प्रदीर्घ कालावधी नंतर दिलेल्या आनंदाच्या बातमीमुळे कोकणची जुनी मागणी पूर्ण होतेय ही भावना सर्वत्र उमटू लागले मात्र; ही मेमो कायमस्वरूपी चालू ठेवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोकण रेल्वे मार्गावर मेमू गाड्यांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.
उन्हाळ्यात वाढणाऱ्या प्रवासी वाहतुकीमुळे नियमित गाड्यांवर प्रचंड गर्दी होते, ज्यामुळे प्रवास अस्वस्थ होतो. रेल्वेने हा निर्णय घेतल्याने कोकणवासीयांच्या प्रवासाला जलदता, आराम आणि सुरक्षितता लाभेल. मात्र, स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून ही सेवा केवळ उन्हाळी न ठेवता कायमस्वरूपी आणि बारमाही करण्याची जोरदार मागणी होत आहे.
“हा निर्णय प्रशंसनीय असला तरी, कोकणच्या विकासासाठी मेमू सेवा वर्षभर चालू राहणे गरजेचे आहे,“ रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुट्ट्यांना नवी ऊर्जा मेमो सुरू करून दिली आहे; त्यामुळे रेल्वेचे संवेदनशील पाऊल टाकले असून त्याचे कौतुक कोकणात मोठ्या प्रमाणात होत आहे. या उपक्रमामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर कुटुंबांच्या उन्हाळी नियोजनाला देखील बळकटी मिळेल.
गावी जाण्याची उत्कंठा, आपुलकीची भेट आणि कोकणच्या हिरव्यागार निसर्गाचा आनंद आता त्रास मुक्त होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या गरजा समजून घेत संवेदनशील भूमिका बजावली असून, यामुळे कोकण रेल्वेच्या भविष्याला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
दिवा- चिपळूण मेमू रेल्वे सेवा सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय हा कोकणातील प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि स्वागतार्ह आहे. अनेक वर्षांपासून कोकणवासी यांची प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्ण होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र ही सेवा केवळ हंगामी न ठेवता बारमाही नियमित सुरू ठेवावी, जेणेकरून विद्यार्थ्या पासून कर्मचारी, व्यापारी, पर्यटक, कामगारा पर्यंत सर्वच प्रवाशांना सातत्याने लाभ मिळेल. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी व बारमाही मेमू सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा .- पंकज तांबे उपाध्यक्ष, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी.