नेवाळी : ठाण्याच्या कचऱ्याच्या दुर्गंधीने डायघर ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या ठाणे मनपाच्या अधिकाऱ्यांचे कारनामे ग्रामस्थ सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत. डायघर परिसरात प्रचंड कचऱ्याची दुर्गंधी पसरली असल्याने ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आदेश देऊनही पालन न करणाऱ्या ठाणे मनपाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा योग्य समज देण्याची मागणी ग्रामस्थ करणार आहेत.
ठाण्याच्या कचऱ्याचे डायघर वीज निर्मिती प्रकल्पात भले मोठे डोंगर तयार झाले आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी मोठा संघर्ष केला असताना देखील ठाणे मनपाने याकडे कानाडोळा केला होता. लोकसभा निवडणुकीच्या कालखंडात मनस्तापामुळे ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अशोक शिनगारे यांनी ग्रामस्थांशी मध्यस्थी करून संयुक्त बैठकीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी डायघर ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, ठाणे मनपा यांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत ठाणे मनपाच्या कारभारावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत तातडीने कचऱ्याचे डोंगर खाली करण्याचे निर्देश दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ठाणे मनपाच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमण झाले आहेत. जो पर्यंत कचऱ्याचे डोंगर खाली करत नाहीत तो पर्यंत ठाण्याचा कचरा प्रकल्पात टाकू नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
जर सोमवारपर्यंत ठाणे मनपाने निर्माण केलेला कचऱ्याचा डोंगर रिकामा केला नाही तर डोक्यावर डायघर प्रकल्पातील ठाण्याचा कचरा, हातात विळे, कोयती घेऊन ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत. आपल्या आदेशाला देखील ठाणे मनपा केराची टोपली दाखवत असून कोणत्याही प्रकारचे पालन करत नसल्याने ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाची झळ पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शासन आणून देणार असल्याचे डायघर पंचक्रोशी समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगितले.