रघुनाथ भागवत
खाडीपट्टा: जुन महिन्याच्या शेवटी मान्सुनने सुरुवात केली खरी, मात्र नॉन स्टॉप रिमझिम कधी मुसळधार, अतिवृष्टी सुरुच होती. एकही दिवस व्यत्यय न आणता प्रथमच नॉनस्टॉप पावसाची संततधार यावर्षी सुरु राहिली आहे.
त्यामुळे येथील मुख्य पिक असलेल्या भात शेतीने चांगली उभारी घेतली असून खाडीपट्टयाच्या शिवारात फेरफटका मारला असता सद्या बहरलेल्या भातशेतीचे वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे.
खाडीपट्टयात सद्या भातशेतीचे तरवे चांगले बहरले असून समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी राजा देखील सुखावला आहे. पेरणी केल्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. दुबार पेरणीचे संकट उभे राहाते की काय ? असा प्रश्न उभा असतानाच शेतकऱ्यांची हाक ऐकून अखेर पावसाने बरसात केली, ती थेट लावणी पूर्णत्वाकडे जाईपर्यंत एकही दिवस उघडीक न घेता चांगली साथ दिल्याने भात शेती पेरणीसह लावणी देखील निर्वीघ्नपणे पार पडली आहे. त्यामध्ये काहीसे शेतकऱ्यांमध्ये समाधान कारक वातावरण आहे.
पावसाची संततधार कायम असतानाच श्रावण महिना सुरु झाल्यापासून पावसाची रिमझिम सुरु आहे ती अशीच साथ देणारी सुरु रहावी जेणेकरुन भात शेतीला पुरक नैसर्गिक वातावरण मिळू शकेल.
तसेच नुकतीच लावणी संपली असल्यामुळे कडक उन्ह झाले तर तापीमुळे जमीनीतील ओलावा निघून गेल्यास त्याचा परिणाम भात पिकावर होण्याची दाट शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तुर्तास सद्या आतापर्यंत निसर्गाने चांगली साथ दिली आहे, ती अशीच राहो अशी इच्छा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पाऊस गेली कित्येक दिवस समाधानकारक पडत असून त्यामुळे येथील खरीप हंगामाची भात शेती चांगलीच बहरली असल्याचे खाडीपट्टयातील चित्र आहे. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. सुरू असलेले पावसाची संततधार अशीच कायम सुरू राहणे गरजेचे आहे.
दरम्यान, आतापर्यंत निसर्गाने दिलेली चांगली साथ अशीच भात कापणी पर्यंत देत राहो अशी प्रांजळ इच्छा व्यक्त करुन यावर्षी चांगले पीक हाती लागेल अशी आशा शेतकऱ्याला हिरवेगार सर्वत्र फुललेले धरतीवरील वातावरण पाहून वाटत आहे. शेतकऱ्यांना चाकरमान्यांची चांगली साथ खाडीपट्टयातील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पीक घेतले जाते.
यामध्ये सुवर्णा, गुजराती कोलम, ओवा, मसुरी कोलम आदी पिकांची पेरणी केली जाते. दरवर्षी पेरणीच्या वेळेस पावसाचे आगमन होऊन पुन्हा सात, आठ दिवस पाऊस गायब होत असतो. मात्र यावर्षी थोडा अशीरा दाखल झालेला मान्सून समाधानकारक संततधार पडत राहिल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.
यावर्षी शेतकऱ्याला चाकरमान्यांनी चांगली साथ दिली आहे. शनिवार, रविवारच्या सुट्टी दरम्यान चाकरमान्यांनी गावी येऊन शेतीच्या कामात हातभार लावला असून मजुरी वाढल्यामुळे शेती परवडत नाही, तसेच मजुरदार देखील मिळत नसल्याची अडसर दुर करण्यात चाकरमान्यांची साथ लाभल्याचे शेतकऱ्यांनी अवर्जन सांगितले.