किल्ले रायगड : इलियास ढोकले / श्रीकृष्ण बाळ
किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचे 32 मणाचे सिंहासन उभारणार असल्याचा आठ वर्षापुर्वींचा निर्णयाला मंगळवारी (दि.11) पुन्हा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी दुजोरा दिला. या संकल्पाला राज्य सरकारचा पाठिंबा असल्याचे जाहिर करत भिडे गुरुजींच्या संकल्पाला मंत्री भरत गोगावले यांनी बळ दिले.
देशातील तरुणाईच्या वाढत्या व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त करून तरुणाईने व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन भिडे गुरुजी यांनी किल्ले रायगडावरील प्रतिष्ठानच्या धारातीर्थ गडकोट मोहीम समारोपाप्रसंगी उपस्थित लाखो धारकरी मावळ्यांना करतानाच हिंदू धर्म व राष्ट्र निर्मिती कामे सर्वांनी एकसंघपणे कार्यरत राहण्याचे व संविधानाचे पालन करण्याचे आवाहन केले. तर मंत्री भरत गोगावले यांनी संभाजी भिडे गुरुजी यांनी केलेल्या संकल्पानुसार छत्रपतींच्या सोन्याच्या सिंहासनासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य देण्यास आपण वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले. आपल्या सुमारे एक तासाच्या परखड स्पष्ट व ओघवत्या भाषणामध्ये संभाजी भिडे गुरुजी यांनी देशाच्या सद्यस्थितीबाबत मार्मिक विवेचन केले. यावेळी उपस्थित धारकरी यात्रेकरूंना संबोधित करताना त्यांनी देशातील गोहत्या प्रकरण तसेच देशातील व्यसनाधीन तिकडे वळणार्या तरुण वर्गाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. यामुळे देश अधोगतीला जाण्याची भीती त्यांनी वर्तवली.
महिलांवर होणारे अत्याचार ही चिंताजनक बाब आहे. महिलांवर अत्याचार करणार्याला भर चौकात ठार मारणे गरजेचे आहे. आणि हे काम शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते करतील असे विधान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे.
देश एकसंघ एकत्र राहण्यासाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी संविधानाचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रत्येक गावातून भव्य स्वरूपात पदयात्रा काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मंत्री भरत गोगावले यांनी याप्रसंगी केलेल्या आपल्या मनोगतामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी केलेल्या संकल्पची म्हणजेच किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या सोन्याचे सिंहासन निर्माण करण्याकरता आवश्यक असलेली सर्व मदत करण्याची ग्वाही देऊन आपण यासाठी वचनबद्ध असल्याचे जाहीर केले. किल्ले रायगडावर गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळापासून शिवप्रतिष्ठानचे धारकरी रोज छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करण्यासाठी येतात याची दखल घेऊन या रोज येणार्या धारकरी युवकांसाठी गडावर आवश्यक असणारी सर्व सुविधा त्यांना देण्यात येईल, त्याचप्रमाणे त्यांच्या राहण्यासाठी निवास व्यवस्था करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय लवकरच घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. श
याप्रसंगी व्यासपीठावर मंत्री भरत गोगावले यांसह पश्चिम महाराष्ट्रातील आमदार अशोकराव माने, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शंकरराव मांडेकर, आमदार अमोल जावळे, आमदार अनुपराव अग्रवाल, तसेच केतकी पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री रावसाहेब देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. संभाजी भिडे गुरुजी समवेत गेल्या चार दिवसात अनेकदा आपण केलेल्या चर्चेमध्ये त्यांचा दिसून येणारा उत्साह आजच्या तरुण वर्गालाही लाजवेल असा असल्याचे सांगून हिंदू धर्म व राष्ट्र निर्माण कामी संभाजी भिडे गुरुजी यांनी घेतलेले व्रत हे पुढील पिढीला प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मोहीमेचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर उसळला धारकर्यांचा भगवा जनसागर , हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शपथ घेऊन केली वज्रमूठ नरवीर शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ ते किल्ले रायगड चार दिवसाच्या या मोहिमेत हिंदू धर्म की जय भारत माता की जय अशा घोषणा देत आजच्या शेवटच्या दिवशी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड वर सांगता समारोप झाला, यावेळी होळीच्या माळावर लाखो धारकर्यानी भगवे फेटे परिधान केल्यामुळे संपूर्ण गड भगवामय झाला होता. या सांगता समारोप साठी विविध पक्षातील राजकीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी शिवभक्त आणि महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून शिवभक्त धारकरी उपस्थित होते, विशेष म्हणजे चार दिवसाच्या या मोहिमेत शिवभक्तांची शिस्त वाखाणण्याजोगी होती.