Central Railway Ticket Checking
रोहे : रेल्वेमधील विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून ‘फोर्ट्रेस’, ‘अॅम्बुश’ आणि इतर विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येत आहेत. या कारवाईत एप्रिल ते मे २०२६ या ६१ दिवसांच्या कालावधीत १४ हजार ७४४ प्रकरणे उघडकीस आली असून त्यातून ६२.०८ लाख रुपयांचा महसूल दंड स्वरूपात वसूल करण्यात आला आहे. दररोज सरासरी २४१ प्रकरणे नोंदवून सुमारे १.०१ लाख रुपयांचा दंड वसूल होत आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत, खोपोली, कसारा, पनवेल, उरण, माहीम तसेच ठाणे ते वाशी या विस्तृत उपनगरीय मार्गांवर दररोज १,८२० लोकल फेऱ्यांद्वारे सुमारे ३९ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. यामध्ये १०८ वातानुकूलित लोकल सेवांचाही समावेश आहे.
प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी सेवा देतानाच रेल्वे प्रशासन विनातिकीट व नियमबाह्य प्रवासामुळे होणारे महसुली नुकसान रोखण्यासाठी विशेष दक्षता घेत आहे. यासाठी नियमित तिकीट तपासणीव्यतिरिक्त स्थानके आणि गाड्यांमध्ये विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येतात.
‘फोर्ट्रेस’, ‘अॅम्बुश’, ‘स्पॉट’, ‘इंटेन्सिव्ह’ आणि ‘क्रॉस-कंट्री’ तपासण्यांच्या माध्यमातून मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवासाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या मोहिमा केवळ महसूल संरक्षणासाठी नसून प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना न्याय मिळावा, हा त्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.
दरम्यान, रोजच्या प्रचंड प्रवासी संख्येमुळे प्रत्येक प्रवासी आणि प्रत्येक गाडीची तपासणी करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी वैध तिकीट खरेदी करून जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क अधिक सुरक्षित, सुरळीत आणि नियमबद्ध ठेवण्यासाठी प्रवाशांनी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असेही मध्य रेल्वेने म्हटले आहे.