जयंत धुळप
रायगड: मुंबई-पुणे आणि पुण्याहून कोकणाला जोडणाऱ्या बोर घाट आणि ताम्हिणी घाटातील प्रवास दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत चालला आहे. दाट धुक्यांमध्ये दरडी कोसळल्यानंतर दोन्ही घाटांतील वाहतूक ठप्प होते. पावसाळ्यात या घाटात होणारे अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
बोर घाट (खोपोली ते खंडाळा)
१८ किमीच्या या घाटात प्रचंड वाहतूक आणि अतिवेगामुळे हा घाट अपघातांचे केंद्र बनला आहे. पावसाळ्यात कमी दृश्यमानता आणि 'अमृतांजन पॉईंट' येथील तीव्र उत्तार गाड्या अनियंत्रित करतात. 'आडोशी बोगद्या जवळ दरड कोसळण्याचा, तर नव्या 'मिसिंग लिंक' वर सेल्फीसाठी थांबणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
ताम्हिणी घाट (मुळशी ते माणगाव)
१५ किमीच्या या घाटात वीकेंडला पर्यटकांची गर्दी होते, घाटात रात्री पथदिवे नसतात. तीव्र उन्हामुळे दगडांची रचना बदलून ते थेट रस्त्यावर कोसळत आहेत. दोन वर्षांपूर्वी यात एका महिलेचा मृत्यूही झाला होता. 'प्लस व्हॅली' येथील ब्लाईंड कॉर्नर्स आणि 'कुंभे धबधब्या' जवळील निसरडा रस्ता दुचाकीस्वारांसाठी काळ ठरत असतो.घाटांची दुरवस्था व सुरक्षेचा अभाव यास जबाबदार यंत्रणात समन्वयाचा अभाव आहे.
सावर्जनिक बांधकाम विभाग : राज्य महामार्गांची देखभाल, संरक्षक कठडे आणि दरडी हटवणे. एनएचएआय - राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, बोगदे आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा. एमएसआरडीसी-एक्स्प्रेसवे (बोर घाट) सारख्या विशेष प्रकल्पांची देखभाल व आपत्कालीन व्यवस्था.
जिल्हा प्रशासन : आपत्ती काळात घाट बंद करणे व समन्वय राखणे अशी त्यांची जबाबदारी आहे; पण ती पूर्ण होताना दिसत नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएचएआय आणि एमएसआरडीसी या सर्व यंत्रणांना महामार्ग सुरक्षा व मान्सूनपूर्व उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पर्यायी मार्ग व्यवस्था करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.- सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड)