कोप्रोली-उरण: सरकारला तिसरी मुंबई उभी करायची असेल तर ती शेतकऱ्यांच्या प्रेतावर उभी करावी लागेल असे परखड मत माजी न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी मांडले. एमएमआरडीएच्या प्रस्तावित कर्नाळा साई चिरनेर (के एस सी)नवनगर तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी चिरनेर येथील, चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्मा स्मारक भूमीत रविवारी सायंकाळी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोळसे पाटील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी तिसऱ्या मुंबईला जमिनी न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला.
यापुढे बोलताना बी जी कोळसे पाटील म्हणाले, तिसऱ्या मुंबई विरोधातील लढाई ही वेगळ्या स्थरावर आहे. न्यायालय,पोलीस त्यांची काम करीत होते. गृहमंत्री हा लढा कसा यशस्वी होणार नाही यासाठी प्रयत्न करतील.
शेतकरी विरोधी कायदे मोदींना परत घ्यावे लागले. शांतता आणि कायद्याच्या मार्गाने आंदोलन करणार मात्र जनशक्ती पुढे सर्व शून्य आहे. त्यामुळे जनतेने लढ्यात उतरले पाहिजे. यात माझा पहिला क्रमांक असणार आहे. प्रकल्पा शेजारी भांडवलदार,राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांच्या जमीनी कशा असतात असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
न्यायालय आणि सरकार आपलं नाही. मात्र शेतकरी या सरकारचे बाप आहेत. कोणत्याही आंदोलनात तडजोड नाही. आमच्या प्रेतावर हे आंदोलन होईल असा निर्धार शेतकऱ्यांना करण्याचे आवाहन त्यांनी केली. घटना आणि शांतता यांच्यां मार्गाने हे आंदोलन करावे लागेल. येथील राजकीय नेते दलाल आहेत. त्यांच्या पासून सावध राहील पाहिजे. असे मत न्यायमूर्ती यांनी व्यक्त केले.
उरण, पनवेल आणि पेण मधील १२४ गावातील ८० हजार एकर शेतीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या जमीन सिडकोच्या नवी मुंबई प्रकल्पासाठी जमीनी संपादीत करण्यात आल्या आहेत.
येथील शेतकरी आणि समाज उध्वस्त झाला आहे. रायगड जिल्ह्यात प्रस्तावित तिसऱ्या मुंबई प्रकल्पाविरोधात शेतकरी भूमिपुत्र आणि ग्रामस्थांनी पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेतली असून, नवनगर विरोधी समिती रायगड हा लढा यशस्वी करेल. आपली जमीन, आपले हक्क, आपले भविष्य या घोषवाक्यखाली आयोजित करण्यात आलेल्या या सभेत तिसऱ्या मुंबई प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी, ज्या अंबानींना करोडो रुपये ओतून सुद्धा जर रायगडच्या शेतकऱ्यांचे इनाम विकत घेता आले नाही. त्या येथील शेतकऱ्यांना सलाम करतो. नवनगर हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी नाही, शेतमजुरांसाठी नाही, फक्त आणि फक्त बिल्डरांसाठी हा आणलेला प्रकल्प आहे, असा आरोप केला.
याप्रसंगी माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, उल्का महाजन, राजिपचे सदस्य डॉ. मनीष पाटील, अविनाश ठाकूर, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरपंच भास्कर मोकल, संतोष ठाकूर, सचिन घबाडी, दीपक कातकरी, समाधान ठाकूर, सभापती महेश म्हात्रे, रवी घरत, नारायण घरत, प्रफुल्ल खारपाटील, भूषण पाटील, महेंद्र ठाकूर, निलेश पाटील, मेघनाथ पाटील, प्रशांत पाटील, निनाद नाईक, विक्रांत पाटील, कृष्णा पाटील, आदी उपस्थित होते.