सुधागड : संतोष उतेकर
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुढील आठवड्यात गणेश उत्सव आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनापूर्वी हे खड्डे भरा अन्यथा खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करू असा इशारा शिवसेनेने (उबाठा) दिला आहे. पाली शहर प्रमुख विद्देश आचार्य यांच्या नेतृत्वाखाली मागणीचे निवेदन पाली मुख्याधिकारी यांना दिले.
या निवेदनात नमूद केले आहे की 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. दरवर्षी मुंबई, ठाणे व पुणे येथील चाकरमानी गणपती सणासाठी पाली व सुधागड तालुक्यातील खेडोपाड्यात येतात. तसेच पाली शहर हे अष्टविनायक तीर्थक्षेत्र आहे. मात्र पाली शहरातील खड्डे येथे येणारे भाविक व नागरिकांना डोकेदुखी ठरत आहेत. शहरातील जुने पोलिस स्टेशन ते गणपती मंदिर हटाळेश्वर चौक ते विक्रम स्टँड तसेच पालीतील अनेक ठिकाणच्या इतर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे.
खड्डे व खराब रस्त्यांमुळे गणेश मूर्ती आगमन व विसर्जन करणे नागरिकांकरिता त्रासदायक ठरणार आहे. कित्येक वाहनांचे नुकसान देखील झाले आहे. हे खड्डे वेळीच बुजवले गेले नाही तर गंभीर अपघात होऊन कोणाचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे याकडे आपण तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. परिणामी सदर समस्या गणपती बाप्पाचे आगमन होण्याच्या अगोदर सोडवावी. सर्व रस्त्यावरील खड्डे योग्यप्रकारे पूर्णपणे भरण्याची दक्षता घ्यावी अन्यथा शिवसेना (उबाठा) स्टाईलने खड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
पाली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी माधुरी मडके यांना खड्ड्यांच्या संदर्भात निवेदन देतांना शिवसेना (उबाठा) पाली शहर प्रमुख विद्देश आचार्य, पाली उपशहर प्रमुख सुरज गुप्ता, तसेच किशोर चौधरी व ललित जावरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
खड्ड्यात आदळून दुचाकीस्वार जखमी
पाली शहरातील जुने पोलिस स्टेशन ते गणपती मंदिर हाटाळेश्वर चौक ते विक्रम स्टँड तसेच पालीतील अनेक ठिकाणच्या इतर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे. खराब रस्त्यांमुळे गणेश मूर्ती आगमन व विसर्जन करणे नागरिकांकरिता त्रासदायक ठरणार आहे. तसेच रस्त्यांवर बेसुमार खड्डे असून खड्ड्यात आदळून दुचाकीस्वार गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत.