येथील नागोठणे-वरवठणे-रोहाकडील गावांना जोडणारा साधारण चारशे वर्षापूर्वीचा आंबा नदीवरील मोगलकालीन ऐतिहासिक अरुंद पूलावरून वाहतुकीस बंदी असल्याचा बोर्ड पूलाच्या दोन्ही बाजूला महाराष्ट्र शासनाने साधारण नऊ वर्षापूर्वी महाड येथील दुर्घटनेनंतर लावला होता. त्यानंतर रविवार 15 जून रोजी पुण्यातील इंद्रायणी नदीवरील दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या महाड विभाग सार्वजनिक बांधकाम खात्याने पूलाच्या प्रवेशावर बंदीचा बोर्ड लावून पूल पूर्णपणे बंद केला असल्याने विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत असून त्यांना आता दोन ते तीन की.मी. पायपीट करावी लागणार आहे.
साधारण चारशे/साडेचारशे वर्षापूर्वी नागोठणे-वरवठणे तसेच तालुक्याचे ठिकाण रोहा व परिसरातील गावांना जोडण्यासाठी गूळ,चुना व अंडी यांचा वापर करून हा पूल बांधण्यात आला. त्यानंतर अनेक वर्षे या पूलाने लहान मोठ्या पुरासह महापुरही पाहिलेल्या या पूलावरून पूर्वी अवजड वाहनांची ये-जा होत होती.
युती काळात अवजड वाहनास होती बंदी. युती सरकारच्या काळात या पूलावरून एस.टी.,ट्रक,टेम्पो तसेच अवजड वाहनास बंदी घालण्यात आली व त्या अवजड वाहनांची वाहतूक नागोठणे-पोयनाड मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पूलावरून करण्यात आली. तेव्हापासून या पूलावरून जीप, कार, रिक्षा, मोटरसायकल जाण्यासाठी जागा ठेऊन दोन्ही बाजूला कठडे बांधण्यात आले. त्यामुळे अवजड वाहतूक बंद झाली. कालांतराने कठडे तुटल्यानंतर नागोठणे येथून रोहाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून या पूलावरून अवजड वाहतूक(खाजगी वाहने) पुर्ववत चालू झाली.
महाड येथील पूल दुर्घटनेनंतर पुर्णपणे वाहतुकीस बंद - 2 ऑगस्ट 2016 रोजी महाड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने सदरील पूलावरून सर्व प्रकारच्या वाहनास बंदी आहे. पर्यायी मार्गाचा वापर करा. असा बोर्ड लावण्यात आला. वाहतूक बंदीचा बोर्ड लावला असला तरी या पूलावरून कार, जीप, रिक्षा, मोटरसायकल यांची वाहतूक आजपर्यंत राजरोज चालू होता.
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर पुन्हा प्रवेश बंदी -- पुणे-कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पुल दुर्घटने नंतर सदरील पुलाच्या प्रवेशव्दारावर महाराष्ट्र शासन , सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी सदरील पूल कमकुवत असल्यामुळे वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत असल्याचा दोन्ही बाजुला बोर्ड व बॅरीकेट्स लावून पूल बंद करण्यात आला आहे.
वेळेचे नियोजन,रात्री अपरात्री वाहन व्यवस्था नसल्याने विद्यार्थी व नागरिकांचे हाल होणार असून पुलावर वाहनास बंदी असल्याचा बोर्ड लावल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असले तरीही या पूलाचा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी तसेच विद्यार्थी,नागरिकांना जवळचा पर्यायी मार्ग म्हणून विद्यार्थी,नागरिक व एकादी मोटरसायकल प्रवास करतील एवढ्या रुंदीची जागा ठेऊन दोन्ही बाजूला मजबूत कठडे संबंधित खात्याने बांधावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवीन पूल बांधण्याची मागणी - सदरील पूल हा 400 ते 450 वर्षापासुनचा पुल आहे. यावरील 1995 साली युती सरकारने अवजड वाहतूक बंद केली आहेत. तेव्हा पासून अवजड वाहतूक बंद असली तरी यावरच न थांबता या ठिकाणी नवीन पूल होणे गरजेचे आहे.याबाबत मी खासदार,आमदार यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे परंतु याचे साधे उत्तरही आले नाही.हा पुल चुना व दगडाने बांधलेला होता परंतु आता त्याची दगडे निघून जात असून पूल पोकळ झाल्याचे निदर्शनात येत आहे.
आजपर्यंत तेथे वाढलेली झाडे झुडपे यांची साफसफाई संबंधित खात्याने केलेली नसून ती साफ सफाई मी नेहमी करीत असलो तरीही आज ना उद्या हा पूल पडणार असून या ठिकाणी शासनाने लक्ष दिले पाहिजे जेणे करून जीवितहानी होणार नाही.तसेच सदर पुलाच्या शेजारी नविन पुल बांधकाम करण्यासाठी मी अनेक वर्षे प्रयत्न करीत असल्याचे वरवठणे येथील ग्रामस्थ तथा भाजपा माजी उपजिल्हाध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी सांगितले.