पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या अलिबाग शहराला आता कचऱ्याच्या गंभीर समस्येने विळखा घातला आहे. शहरातील डंपिंग ग्राउंडची क्षमता संपत आल्याने आणि कचरा व्यवस्थापनाचे ठोस नियोजन नसल्याने अलिबागकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः डंपिंग ग्राउंडला लागणाऱ्या आगी आणि त्यातून निघणारा विषारी धूर यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत.
डंपिंग ग्राउंडची दुरवस्था-अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने जमा केला जाणारा कचरा सध्या ज्या ठिकाणी टाकला जातो, तिथे कांदळवने आहेत. कचऱ्याचे मोठे डोंगर साचले आहेत. पावसाळ्यात या कचऱ्याची दुर्गंधी सर्वत्र पसरते, तर उन्हाळ्यात उष्णतेमुळे कचऱ्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या धुरामुळे नजीकच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत.
पर्यटनावरही परिणाम- स्वच्छ आणि सुंदर अलिबाग पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही अनेकदा कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असून, स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रशासनाची भूमिका- नगरपरिषद प्रशासनाकडून ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे आवाहन वारंवार केले जाते, मात्र कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणारा प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नाही. नवीन डंपिंग ग्राउंडसाठी जागेचा शोध सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात ठोस कार्यवाही कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डंपिंगची कायमस्वरूपी व्यवस्थाकरा-नागरिकांची मागणी
डंपिंग ग्राउंडच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. कचरा डेपोची जागा वस्तीपासून लांब हलवावी किंवा तिथेच आधुनिक प्रक्रिया प्रकल्प उभारून प्रदूषण रोखावे,“ अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.जर प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आगामी काळात अलिबागमध्ये कचरा कोंडी होऊन आरोग्याचा मोठा अनर्थ ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अलिबाग नगरपरिषद आणि शेजारील चोंढी,वरसोली,कुरुळ आणि वेश्वी या ग्रामपंचायतीं असे संयुक्त डंपींग ग्राउंड करण्यात येत आहे. त्या करिता जिल्हा प्रशासनाकडून अलिबाग पासून 18 किमी अंतरावर असलेल्या डावली या गावाजवळ जागा प्रस्तावीत केली आहे. अलिबाग नगरपरिषदेने या जागेकरिता संमती दिली आहे. ग्रामपंचायतींची सम्मती प्राप्त होताच पूढील कार्यवाही होईल. आणि डंपींग ग्राउंडचा प्रश्न सुटेल.सागर साळुंखे,मुख्याधिकारी, अलिबाग नगरपालिका परिषद,अलिबाग