रायगड ः महावितरण कंपनीच्या भरमसाठ वीज बिल, रिडींग न घेणे अशा अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्यांना नागरिकांना होणार्या या त्रासाबाबत शेतकरी कामगार पक्षाने अलिबागमधील महावितरण कंपनी कार्यालयावर धडक दिली.
सोमवारी (15 सप्टेंबर) शेकाप तालुका चिटणीस मंडळाच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या नेतृत्वाखाली अधिकार्यांना जाब विचारण्यात आला. भरमसाठ बिल येणे थांबवा, नियमीत दर महिन्याला रिडींग घ्यावी अशी मागणी केली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांच्या मागणीची दखल घेत कार्यवाही केली जाईल असे महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी आश्वासन दिले.
यावेळी शेकाप तालुका सहचिटणीस नरेंद्र म्हात्रे, शहर चिटणीस अनिल चोपडा, प्रफुल्ल पाटील, राजन पांचाळ, अनिल पाटील, नंदकुमार तळकर, आदी पदाधिकारी, वेगवेगळ्या सेलचे पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.
महावितरण कंपनीकडून सक्तीचे स्मार्ट मीटर लावण्याचा गोंधळ सुरु असताना महावितरण कंपनीकडून वेळेवर वीज बिल येत नाही. त्यामुळे ग्राहकांना विशेष करून नागरिकांना आर्थिक भूर्दंड बसत आहे. तीन ते चार महिन्याचे एक रकमी बिल भरणे ग्राहकांना शक्य होत नाही.
भरमसाठ वीज बिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. महिन्याचा आर्थिक ताळमेळ जुळविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. ऐन सणासुदीत भरमसाठ वीज बिल येत असल्याने महावितरण कंपनीच्या कारभाराबाबत नाराजीचे सुर उमटत आहेत. ही बाब शेतकरी कामगार पक्षाच्या निदर्शनास आल्यावर शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी पुढाकार घेत शेकापच्या शिष्टमंडळांनी जनतेच्या हितासाठी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.
संबंधित अधिकार्यांना धारेवर धरले. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पाढाच शेकाप कार्यकर्त्यांनी वाचून दाखविला. भरमसाठ वीज बिल एक रकमी भरणे शक्य होत नाही. त्यामुळे टप्प्या टप्प्याने बिल भरण्याची सवलत द्यावी. वीज युनीट घेण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी येत नाही. त्यामुळे ग्राहकांना वीज वापराची योग्य माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे नियमीत दर महिन्याला विद्युत युनीट घेण्यात यावे अशा अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. कार्यकारी अभियंता शैलेशकुमार यांना निवेदन देण्यात आले.
मागण्यांची दखल तातडीने न झाल्यास जनतेच्या हितासाठी शेकापमार्फत तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. अलिबागमधील कस्टम बंदर येथील मच्छिंद्र मारुती पाटील यांना दर महिन्याला महावितरण कंपनीचे वीज बिल 500 ते 700 रुपये येते. त्यांच्याकडून विजेचा वापर फार होत नसल्याने शेकड्यातच बिल येते. परंतु, या महिन्याचे वीज बिल 1 लाख 23 हजार 670 रुपये आल्याने महावितरणचा अजब कारभार उघड झाला आहे.
अलिबाग तालुक्यातील काही भागात ग्राहकांना छापील वीज बिले मिळत नाही. काही ग्राहकांची नियमित रिडींग न घेता सरासरीद्वारे वीज बिल दिले जात आहे. यामुळे वीज ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अव्वाच्या सव्वा येणार्या वीज बिलांमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शेकड्यात येणारी बिले लाखात येत असल्याने ग्राहकांमध्ये संताप आहे.