उरण: मासेमारीसाठी समुद्रात गेलेले उरण तालुक्यांतील आवरे गावातील ६२ वर्षीय मच्छिमार खलाशी संगम भार्गव गावंड हे संशयास्पदरित्या बेपत्ता झाले असून, त्यांच्या कुटुंबाने घातपाताचा गंभीर संशय व्यक्त केला आहे.
संगम गावंड हे रविवार, २ ऑगस्ट रोजी 'महालक्ष्मी' नावाच्या बोटीवर मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा कुटुंबीयांशी त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही. आठवडाभर उलटल्यानंतर, म्हणजे रविवारी (९ ऑगस्ट) कुटुंबीयांना संगम गावंड बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली.
शासनाच्या नियमानुसार १२ नॉटिकल मैलांपेक्षा जास्त अंतरावर मासेमारी करण्यासाठी केंद्राचा अधिकृत पास असणे बंधनकारक आहे. मात्र, कोणताही पास नसताना 'महालक्ष्मी' ही बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती.
मासे पकडल्यानंतर ही नौका वशेणी खाडीत नांगरण्यात आली. विशेष म्हणजे, संगम गावंड बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांना तातडीने न देता, बोटीतील सर्व मासे विकल्यानंतर बऱ्याच वेळाने देण्यात आली.
एवढेच नव्हे तर बोटीवरील नाखवा आणि इतर खलाशी याप्रकरणी परस्परविरोधी माहिती देत आहेत. कोणी संगम गावंड हे वशेणी खाडीत पडून बेपत्ता झाल्याचे सांगत आहे, तर कोणी ते वशेणी येथून घरी जाण्यासाठी निघून गेल्याचा दावा करत आहे.
खलाशांच्या या संशयास्पद आणि वेगवेगळ्या उत्तरांमुळे कुटुंबीयांच्या संशयात भर पडली असून, यात नक्कीच काहीतरी काळेबेरे किंवा घातपात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. ज्या 'महालक्ष्मी' बोटीवर संगम गावंड काम करत होते, ती बोट ससून डॉक येथे नोंदणीकृत असून करंजा येथील एका नाखवाने ती भागीदारीवर चालवण्यास घेतली होती.
केंद्राचा पास नसतानाही वशेणी बंदरात मासळी विकून बऱ्याच वेळाने उरण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आल्याने बोट चालक नाखवाच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमचे वडील बेपत्ता झाल्याची माहिती आमच्यापासून जाणूनबुजून लपवण्यात आली. बोटीवरील खलाशीसुद्धा वेगवेगळी उत्तरे देऊन दिशाभूल करत आहेत. आम्ही स्वतः बोटीने वशेणी खाडीचा संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र कुठेही वडील किंवा त्यांचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे या संपूर्ण घटनेत घातपाताचा दाट संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे.- समीर गावंड, बेपत्ता खलाशाचा मुलगा