रायगड

रायगड : माणगावजवळ शिवशाही बस-रिक्षा अपघातात ३ ठार

दिनेश चोरगे

माणगाव : महाड येथील नातेवाईकाच्या उत्तरकार्यासाठी रिक्षातून निघालेल्यांवर मृत्यूचा घाला पडण्याची वेळ रविवारी माणगाव येथे आली. मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून 3 कि.मी. अंतरावर असणार्‍या तिलोरे गावच्या हद्दीत मानस हॉटेलसमोर शिवशाही बस व रिक्षामध्ये भीषण अपघात होऊन रिक्षामधील 3 जण ठार झाल्याची घटना घडली. मृत व्यक्ती ठाणे येथील रहिवासी आहेत.

माणगाव पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. 7 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास मानस हॉटेलजवळ शिवशाही बस (एम एच 09 एफ एल 0246) ही ठाणे येथून दापोलीकडे जात असताना रिक्षाच्या (एम एच 04 एफ सी 6282) चालकाने लेनवरून अचानक वळण घेतल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील प्रवीण अनंत मालुसरे, दत्तात्रय नारायण वरंदेकर, गणेश बाबू जाधव (सर्व रा. ठाणे) यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण महाड येथील नातेवाईकाच्या उत्तरकार्यासाठी रिक्षातून निघाले होते. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झालेली होती.

घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस टीम पोलिस हवालदार गणेश समेळ, श्री. सानप घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मयत यांना उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आणण्यात आले. या वेळी सुरक्षारक्षक विवेक नितनवरे, नागेश दिपके यांनी सहकार्य केले. या घटनेचा पुढील तपास माणगांव पोलीस करीत आहेत.

SCROLL FOR NEXT