महाड: भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनाचा सण महाडमध्ये रविवारी अक्षरशः भावनांचा महासागर घेऊन आला. महाडचे आमदार, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या ढालकाठी येथील ‘शिवनेरी’ निवासस्थानी शिवसेना महिला आघाडी महाड विधानसभा यांच्या वतीने आयोजित भव्य रक्षाबंधन सोहळ्यास तब्बल दहा हजारांहून अधिक लाडक्या बहिणींनी उपस्थिती लावत आपल्या लाडक्या भावाला राखी बांधली.
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली ही प्रेमाची परंपरा यंदा अधिकच व्यापक आणि भावनिक झाली. सकाळपासूनच शिवनेरी निवासस्थानाकडे भगिनींचे लोंढेच्या लोंढे येत होते. शिवनेरीपासून खरवली फाट्यापर्यंत लाडक्या बहिणींची लागलेली लांबच लांब रांग हा या सोहळ्याचा विशेष आकर्षणाचा विषय ठरला.
या रांगेत लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत, गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी तसेच सर्व धर्मीय भगिनी सहभागी झाल्या होत्या. प्रत्येकाच्या हातात राखी आणि मनात आपल्या भावाबद्दलचा जिव्हाळा होता. राखी बांधल्यानंतर मिळणारी प्रेमाची भेट, दोन शब्दांची आपुलकीची विचारपूस आणि भावाच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हास्य, या क्षणांनी संपूर्ण परिसर भावूक झाला होता.
चार वर्षांची परंपरा बनली जिव्हाळ्याचा उत्सव मतदारसंघातील भगिनींकडून राखी बांधून घेण्याची परंपरा भरतशेठ गोगावले यांनी गेल्या चार वर्षांपासून जपली आहे. त्यामुळे हा सोहळा आता केवळ राजकीय कार्यक्रम राहिलेला नसून गोगावले कुटुंब आणि मतदारसंघातील भगिनींमधील स्नेह, विश्वास आणि आपुलकीचा कौटुंबिक उत्सव बनला आहे.
यंदा भरतशेठ गोगावले यांच्यावर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघासह रायगड जिल्ह्याच्या विविध भागांतून भगिनी मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी दाखल झाल्या.
प्रत्येक भगिनीची आपुलकीने विचारपूससोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येक भगिनीचे गोगावले कुटुंबीयांकडून मनापासून स्वागत करण्यात आले. सुषमाताई गोगावले, साधनाताई गोगावले, शितल गोगावले, कोमल गोगावले यांच्यासह गोगावले कुटुंबीय तसेच महाड विधानसभा मतदारसंघातील महिला व पुरुष पदाधिकारी स्वतः प्रत्येक भगिनीची विचारपूस करीत होते.
पालकमंत्री भरत गोगावले यांच्यासोबत युवा सेना कोअर कमिटी सदस्य तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनाही भगिनींनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या.
‘बहिणींच्या पाठींब्यामुळेच चार वेळा आमदार झालो’ यावेळी बोलताना पालकमंत्री भरतशेठ गोगावले भावूक झाले. “माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेला पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे.
याच बहिणींच्या आशीर्वादामुळे मला चार वेळा आमदार म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली. त्यानंतर मंत्री आणि आता रायगडचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली,” असे त्यांनी सांगितले.
“या बहिणींनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो मी कधीही विसरणार नाही. त्यांच्या अडीअडचणीच्या काळात हा भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील,” अशी भावनिक ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.