पुणे

हॉटेलमधून मिळतात भेसळयुक्त खाद्यपदार्थ

अमृता चौगुले

माणिक पवार

नसरापूर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व्यावसायिक वेळेचे कोणतेही बंधन न पाळता मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. मुदत संपलेल्या शीतपेयांसह खाद्यपदार्थांच्या वस्तूंची खुलेआम विक्री येथे सुरू असून, अनेक खाद्यपदार्थांमध्ये नानाविध शकला करून भेसळयुक्त प्रकार वाढत आहे. अशा मुजोरी करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर अन्न प्रशासन विभागाचा जरब नसल्यामुळे हॉटेलचालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. शिंदेवाडी, वेळू, खेड शिवापूर टोलनाका, वरवे, केळवडे, चेलाडी फाटा, कामथडी, कापूरव्होळ, भोरफाटा, किकवी, सारोळा या प्रमुख गाववेशीवर जवळपास 50 ते 60 छोटी-मोठी हॉटेल आहेत.

त्यातच रस्त्याच्या कडेला अनेक हॉटेल व्यावसायिकांनी डोके वर काढले आहे. हॉटेलचालकांकडून संपलेल्या मुदतीचे खाद्यपदार्थ व भेसळयुक्त अन्नपदार्थ सर्रास दिले जातात. याबाबत प्रवासी किंवा ग्राहकांनी विचारणा केली तर हॉटेलचालकाकडून उलटपक्षी त्यांना अरेरावीची भाषा वापरली जाते. हॉटेलचालक व ग्राहक यांच्यात अनेक वादाच्या घटना घडल्या असून, याबाबत महामार्ग प्रशासन काणाडोळा करीत असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे.

शिंदेवाडी ते सारोळ्यापर्यंतच्या हॉटेलचालकाकडून महामार्गावरील दुभाजक रातोरात तोडले जात आहेत. महामार्गालगतच हॉटेलमधील सांडपाणी रस्त्यावर सोडले जाते, तसेच उरलेले अन्न, चहाचे रिकामे कप, द्रोण, प्लास्टिक बाटल्या, पिशव्यांसह इतर कचरा बिनदिक्कत महामार्गालगतच टाकला जातो. यामुळे घनकचरा निर्माण झाल्याने महामार्गाला कचर्‍याचा विळखा बसत आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीने प्रवाशांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. भेसळयुक्त व मुदत संपलेल्या खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या हॉटेलचालकांवर अन्न प्रशासन विभागाने वेळीच कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

'त्या' हॉटेलवर कारवाई होणार कधी?
पुणे-सातारा या मार्गावर अनेक हॉटेल व लॉजिंग आहे. प्रामुख्याने खेड शिवापूर, वरवे, कामथडी, खुटवडवस्ती, कापूरव्होळ व सारोळा येथील आलिशान हॉटेल व लॉजिंग रात्रभर सुरूच असतात. काही हॉटेलमध्ये अवैध धंदे, विनापरवाना मद्यविक्री व वेश्याव्यवसाय चालत असल्याचे समजते. अनेक हॉटेल ही बड्या आसामींची असल्याने स्थानिक प्रशासनाकडून ढुंकूनही पाहण्याची तजवीज होत नाही. कोणाच्या आर्थिक गणितातून कारभार सुरू आहे का, असा खडा सवालही स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

SCROLL FOR NEXT