शिरगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिरगाव परिसरातील भातखाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी भात लावणीच्या कामाला प्रथम प्राधान्य दिल्याचे चित्र या भागात दिसून येत आहे. पूर्ण जून महिना पावसाने दडी मारल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकरी वर्गास गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे आनंदी केले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी भात लावणीच्या कामासाठी कंबर कसली आहे. पावसाला उशीर झाला; परंतु वेळ गेली नसल्याने प्रथम आपली भात लावणी उरकून घेऊ अशी प्रत्येक शेतकर्याने गडबड सुरू केली आहे.
शिरगाव, गहूंजे, साळुंब्रे, दारुंब्रे, गोडुंब्रे, सांगवडे, आदी गावात मोठ्या प्रमाणात भात लागवडी सुरु झाल्या आहेत. शिरगाव येथील शेतकरी मारुती गोपाळे म्हणाले की, यावर्षी भात लावणीला पुरेशा पावसाअभावी रखडल्या होत्या; मात्र गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसाने खाचरे तुडुंब भरली होती. त्यामुळे आता वेळ न घालवता आम्ही भात लावणीचे काम दोन दिवसात पूर्ण केले. पुढील मशागती करण्यासाठी वेळ मिळेल.