पुणे : पुढारी वृत्तसेवा: बारावी आणि सीईटी अशा दोन्हींसाठी पुढील वर्षी 50 टक्के महत्त्व देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सीईटीचे महत्त्व कमी होणार असून, बारावीला महत्त्व प्राप्त होणार आहे. परंतु, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकणार नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांकडून बोलले जात आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी होणार की हा निर्णय गुंडाळला जाणार याकडे लक्ष लागले आहे. टिचर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये राज्यातील प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पण, त्यासाठी आवश्यक कर्मचारीवर्गच भरण्यात आलेला नाही. त्यामुळे याठिकाणी ऑफलाईन कोणतेही प्रशिक्षण अद्याप पार पडलेले नाही. त्यामुळे कर्मचारीवर्ग कधी भरणार आणि प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाईंच्या स्मारकाचा विकास करण्यासाठी निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात हा निधी मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटच्या विकासासाठी 1 कोटी रुपये देण्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले होते.
याला अनेक महिन्यांचा कालावधी उलटला. त्यामुळे येत्या काळात हे पैसे मिळणार की ही केवळ वल्गना ठरणार, याकडे 'रानडे'च्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात (एसएनडीटी) 'महर्षी कर्वे कुटिर' स्मारक स्वरूपात विकसित व्हावे. त्यासाठी स्मारकाच्या विकासाला निधी देणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती. तसेच विद्यापीठाला 15 कोटी रुपयांचा निधी देणार असून, तीन वर्षे प्रत्येकी पाच कोटी रुपये देणार असल्याचे स्पष्ट केले होते, आता हा निधी मिळणार का, याकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष लागले आहे.