वाल्हे; पुढारी वृत्तसेवा: वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुख्य बाजारपेठेजवळचा रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी मागील पंधरा – वीस दिवसांपूर्वी खोदला आहे. मात्र, अद्यापही काम सुरू न झाल्याने खड्ड्यात पावसाचे पाणी साठून राहात आहे. साठलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाल्हे येथील पवार आळीकडे जाणारा बाजारातील रस्ता खोदून ठेवला आहे. आठवडे बाजारात अनेक छोटे-मोठे व्यावसायिक व शेतकरी आपला माल घेऊन विक्रीसाठी बसत होते.
मात्र, मागील तीन बाजारात त्यांची मोठी अडचण झाली. रस्ता खोदून ठेवल्याने त्यांच्याकडे ग्राहक फिरकत नसल्याने तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकर्यांसह व्यापार्यांनी सांगितले. खोदून ठेवलेल्या रस्त्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम होणार नसेल तर प्रशासनाने तो रस्ता पुन्हा बुजवून पूर्ववत करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
संबंधित अधिकारी आजारी असल्याने रजेवर होते. तसेच संबंधित रस्त्याचा उतार व्यवस्थित न काढल्याने काम थांबविण्यात आले होते. संबंधित अधिकारी पाहणी करून गेले असून, शुक्रवार दि.12 पासून कामास सुरुवात करणार आहे.
– अमोल खवले, सरपंच वाल्हे.