वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा: वडगावशेरीतील नाले सफाई वेळेवर केली जाईल. पावसाळ्यात नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही, असा दावा केला होता. ही नालेसफाई कागदावरच राहिल्याने नाले तुंबून त्याचे पाणी घराघरांत शिरले. वडगाव शेरीतील हरिनगर येथील नाल्याच्या भोवती सीमा भिंत बांधण्याचे काम अर्धवट झाले आहे. नाल्याची सफाई पूर्ण झाली नाही. या नाल्यावरील अतिक्रमणच्या तक्रारी पालिका अधिकार्यांकडे नागरिकांनी केल्या होत्या. मात्र, त्यांनी नुसती नाल्याची पाहणी केली. तक्रारीवर उपाययोजना केल्या नाहीत. या नाल्यातील दोन चेंबर फुटल्याने नाल्यामध्ये मैलापाणी साचत आहे.
आज दिवसभर होणार्या पावसामुळे नाल्याला पूर आला होता. या नाल्याचे पाणी दहा घरांमध्ये शिरले होते. सागर पार्क सोसायटीमधील एका घरामध्ये पाणी शिरले होते. तसेच, बॉम्बे सॅपर्स सोसायटीमध्ये चेंबर मधून पाणी रस्त्यावर साचले होते. चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. पाणी निचरा करून देण्याचे काम पोलिस करीत होते. रामवाडी गावातील प्रवेशव्दाराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. वडगाव शेरीतील जगदंबा सोसायटीतील दहा ते पंधरा नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेले होते. तसेच या सोसायटीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहेत. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही तत्काळ उपाययोजना करत आहोत.
-सिद्धराम पाटील, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज विभाग
नगररोड-वडगाव शेरी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत पूरपरिस्थिती असलेल्या भागाला भेट देऊन त्वरीत उपाययोजना केली.
-सोमनाथ बनकर, सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय कार्यालय