मुंढवा : पुढारी वृत्तसेवा
वाहतूक कोंडी नियंत्रणात यावी, यासाठी घोरपडी येथील भारत फोर्ज कंपनीच्या पाठीमागे रेल्वे उड्डाणपूल उभारला. मात्र, पुलाच्या पुढे अरुंद असलेल्या जहांगीरनगर चौकामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे हा पूल 'असून अडचण, नसून खोळंबा' ठरत आहे. कोरेगाव पार्क तसेच मुंढवा परिसरातून हडपसरकडे जाण्या- येण्यासाठी नागरिक या पुलाचा वापर करतात.
येथील जहांगीरनगर चौकातून पुढे मगरपट्टा सिटीच्या पाठीमागून सोलापूर रस्त्याकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. मात्र, दररोज सायंकाळी पुलाच्या पुढील जहांगीरनगर चौकात सुमारे एक- दीड कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.
येथील जहांगीरनगर चौकाचे रुंदीकरण केल्यानंतरच येथील वाहतूक कोंडी नियंत्रणात येणार आहे. पण, पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहात नसल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे, त्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी रोष व्यक्त
केला आहे.
स्टंटबाज कुठे गेले?
मागील दोन वर्षांपूर्वी येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला, त्या वेळी श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी स्टंटबाजी करीत या पुलाचे दोन वेगवेगळ्या वेळी उद्घाटन केले होते. पण, नंतर येथे वाहतूक कोंडी होऊ लागल्यावर स्टंटबाजी करणारे इकडे फिरकलेदेखील नाहीत असे नागरिकांनी सांगितले.