पुणे: पुढारी वृत्तसेवा: निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून पावसाळ्यात मूत्रपिंड आणि सांधे समस्या दूर ठेवता येणे शक्य आहे. ज्यांनी मूत्रपिंडाच्या समस्या किंवा सांध्यांसंबंधित आजारांवर उपचार घेतले आहेत त्यांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ऑर्थोपेडिक्स आणि किडनी संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. पावसाळ्यात फक्त त्वचा किंवा पचनाच्या समस्याच उद्भवत नाहीत तर सांधे आणि मूत्रपिंडाच्या समस्याही उद्भवतात.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मूत्रपिंडाचे आजार ही एक सामान्य घटना आहे. हवामानाशी संबंधित सांधेदुखी ऑस्टियोआर्थरायटिस आणि संधिवात असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येते. पावसाळ्यात आर्द्रतेच्या पातळीत बदल, वातावरणाचा दाब, तापमानात होणारा बदल आणि पर्जन्यवृष्टी यामुळे बहुतेक लोकांना सांधेदुखी, स्नायू ताठरणे आणि दुखापतीचा सामना करावा लागतो. संधिवात असलेले लोक अशा बदलांबाबत अधिक संवेदनशील असतात, असे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. आशिष सूर्यवंशी यांनी सांगितले.
पुरेसे पाणी प्या…
मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या, वेळेवर औषधे घ्या, भरपूर हंगामी फळे खा आणि लघवी जास्त काळ रोखून ठेवू नका. या व्यतिरिक्त मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, टायफॉइड, तीव— गॅस्ट्रोएन्टेरिटिस, हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस ई यांसारखे आजारही होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.