भोर; पुढारी वृत्तसेवा: भोर तालुक्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने चांगलीच दडी मारल्याने भात रोपाची वाढ झालेली नाही, तर पाणी नसल्यामुळे भात लावणी रखडली आहे. शेतकरी यामुळे चिंताग्रस्त होऊन जोरदार पावसाची वाट पाहत आहे. भोर तालुका हा भात पीक उत्पादनात अग्रेसर असून 700 हेक्टरवर भात रोपाची लागवड केली जाते. वेळेत पावसाने सुरुवात केली नसल्यामुळे यंदा भात शेती धोक्यात आली आहे. मान्सून पावसाने जून महिन्यात सुरुवात झाली असती तर वेळेत शेतीच्या कामाला सुरुवात झाली असती.
मात्र, पाऊस जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाल्याने खरीप हंगामातील भात तरवे , कडधान्ये पिके यांची गडबडीत पेरणी झाली. आठ ते दहा दिवस जोरदार पाऊस पडला आणि गायब झाला. पाणी असून रोपे बारीक असल्यामुळे लावणी करता येत नव्हती, तर तरवे पाण्यात असल्यामुळे ते कुजून गेली. काही भात तरव्यात पाणी नसल्यामुळे काढणी करता येत नाही. काही भागात रोपाचा तुटवडा भासत असल्यामुळे लावणीअभावी भातशेती शेतकर्यांना पडून ठेवावी लागणार आहे.
महागाईची रासायनिक खते , बियाणे यांची खरेदी करून पेरणी केली आहे. परंतु पाऊस वेळेत पडत नसल्यामुळे यंदा हा खर्च वाया जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊ शकतो.
-अर्जुन चव्हाण, शेतकरी बाजारवाडी, ता. भोर