मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायत भागात पावसाच्या हेळसांडीने पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाळ्यातही पाऊस नसल्याने ओढे, नाले, विहिरी कोरड्या ठणठणीत पडू लागल्या आहेत. परिसरातील शेतकर्यांचे बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
मोरगाव, आंबी खुर्द, जोगवडी, मुर्टी, मोढवे, पळशी, तरडोली, कार्हाटी, खंडूखैरेवाडी, बाबुर्डी, माळवाडी (लोणी) या भागांत पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्यांचे कौटुंबिक अंदाजपत्रक कोसळले आहे. पेरण्यांसाठी मशागती करून ठेवल्या आहेत. मात्र, आभाळात ढगांची गर्दी होऊन पाण्याचा टिपूसही पडत नाही. ढगांचा ऊन-सावलीचा खेळ सुरू असतो. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
चारापिके उपलब्ध नसल्याने ऊस आणून पशुधन जगवावे लागत आहे, असे पशुपालक चिंताग्रस्त मनाने म्हणत आहेत. भागात पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात पाऊस पडला नाही, तर पिण्याच्या पाण्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याची भीती जाणकार शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे.