पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात ज्या शैक्षणिक संस्थांना फार्मसी महाविद्यालय सुरू करायचे आहे, त्यांना आता घाई करावी लागेल. कारण, येत्या 10 ऑगस्टपर्यंत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या पोर्टलवर अर्ज करण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र राज्य शासनाकडून 8 ऑगस्टपर्यंत घेणे अनिवार्य असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी स्पष्ट केले. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेल्या 31 मेच्या आदेशाला अनुसरून नवीन औषधनिर्माणशास्त्र संस्था सुरू करण्यासाठी 3 ते 15 जुलैदरम्यान अर्ज करण्यासाठी त्यांचे पोर्टल सुरू केले होते; परंतु आता पुन्हा एकदा नवीन औषधनिर्माणशास्त्र संस्था सुरू करण्यासाठी 4 ते 10 ऑगस्टदरम्यान त्यांचे पोर्टल सुरू केले आहे.
बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या नवीन संस्थांसाठी शासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील ज्या संस्था नवीन बी. फार्मसी अभ्यासक्रमाची संस्था सुरू करण्यासाठी पीसीआयच्या पोर्टलवर अर्ज करणार असतील, अशा संस्थांनी 8 ऑगस्टपर्यंत शासनाकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठीचा प्रस्ताव संबंधित सहसंचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालये यांच्याकडे सादर करावा. ना-हरकत प्रमाणपत्रासाठी विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थांची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील नवीन औषधनिर्माणशास्त्र संस्था (डी.फार्मसी, बी. फार्मसी. एम. फार्मसी) साठीचे नोंदणी शुल्क संबंधित सहसंचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालयाकडे जमा करावेत, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून फार्मसी शिक्षणाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा फार्मसी शिक्षणाकडे आहे. त्यामुळे फार्मसी महाविद्यालयांची मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवीन फार्मसी महाविद्यालय काढण्याची संधी संस्थाचालकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे दिसून येत आहे.