पुणे

फसवणुकीच्या जाळ्यात पुणेकर घायाळ; आर्थिक प्रलोभनाला पडताहेत बळी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: काबाडकष्ट करून प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन कमवलेली जमापुंजी पुणेकर नागरिक आर्थिक प्रलोभन, लोन अ‍ॅप, दामदुप्पट परतावा, व्यवसायातील कमी वेळात जास्त नफा, अशा विविध कारणांनी ठगांच्या हवाली करीत असल्याचे शहरात चित्र आहे. आर्थिक फसवणुकीबाबत अनेकदा पोलिसांनी केलेल्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून नागरिक अलगद फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहेत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. सायबर चोरटे फसवणुकीत आघाडीवर असतानाच, प्रत्यक्षात होणार्‍या फसवणुकीचे प्रमाण देखील वाढते आहे. गुंतवणूक केलेल्या पैशांवर पंधरा दिवसांत दामदुप्पट पैसे देण्याच्या बहाण्याने 30 ते 35 महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. डिसेंबर 2018 ते मार्च 2022 या कालावधीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी मोदीखाना कॅम्प येथील एका 55 वर्षीय महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरती ठाकूर ऊर्फ कृष्णाबेन, नाजमा सय्यद, सुमेरा सय्यद (रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने आरोपी महिलांच्या 'पंधरा दिवसांत पैसे डबल' योजनेला बळी पडून एक लाख रुपये आरोपींकडे दिले होते. अशाच प्रकारे त्यांच्या परिसरातील 30 ते 35 महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फिर्यादी यांना पंधरा दिवसांत डबल पैसे मिळाले नाहीत. त्या वेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आरती ठाकूर हिने आजी संघटन नावाने ऑफिस उघडून डबल पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक महिलांकडून पैसे जमा केले होते.

आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय सुरू करण्याच्या बहाण्याने एका महिलेची पावणेसहा लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कॅम्प रोड येथील एका 42 वर्षीय महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हन्स कोस्टा आणि मोबाईलधारक व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेकडून आरोपीने आयुर्वेदिक व्यवसाय सुरू करण्यासाठी औषधांसाठी 5 लाख 83 हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर त्यांना विक्रीसाठी कोणतीही औषधे दिली नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

बदनामीच्या धमकीने दीड लाख उकळले
लोन अ‍ॅपवरून घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर देखील एका व्यक्तीकडून सायबर चोरट्याने 1 लाख 56 हजार उकळल्याचे समोर आले आहे. मोबाईलवरून अश्लील व्हॉट्सअ‍ॅप कॉल, मेसेज करून संबंधित व्यक्तीची सामाजिक बदनामी करण्याच्या धमकीने ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथील 31 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईलधारक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणाने विविध प्रकारच्या लोन अ‍ॅपद्वारे ऑनलाईन 35 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची त्याने परतफेड देखील केली होती. मात्र, हे कर्ज घेताना त्याने त्याची सर्व गोपनीय माहिती मोबाईलद्वारे आरोपींच्या ताब्यात दिली होती. पुढे त्याच माहितीचा वापर करून तरुणाला आरोपींनी बदनामी करण्याची धमकी देऊन वेळोवेळी 1 लाख 56 हजार रुपये उकळले.

कर्जाच्या आमिषाने 25 लाख खिशात
नामांकित कंपनीतून फायनान्स कर्मचारी बोलत असल्याचे सांगून 25 लाख रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला 1 लाख 79 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी औद्योगिक वसाहत गुलटेकडी येथील एका 55 वर्षीय व्यक्तीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादींना 25 लाखांचे कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने वेळोवेळी विविध बँक खात्यांवर पैसे भरून घेतले. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तसेच कोथरूड परिसरातील एका व्यक्तीलादेखील कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने 1 लाख 20 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी मोबाईलधारक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोबाईलवर लिंक पाठवून आरोपींनी फिर्यादींना कागदपत्रे अपलोड करावी लागतील, असे सांगून पैसे उकळले आहेत.

परताव्याच्या लोभापायी 15 लाख गमावले
गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने वारजे येथील एका व्यक्तीची 15 लाख 36 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी मनीष संजय चव्हाण (वय 28, रा. परेल, मुंबई) नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणाने आरोपीच्या प्रलोभनाला बळी पडून त्याच्याकडे पैशांची गुंतवणूक केली. मात्र, ठरावीक वेळेनंतर फिर्यादीला ना परतावा मिळाला ना गुंतवणूक केलेली रक्कम. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. एकंदरीत, या सर्व घटना पाहिल्या तर थोड्याशा आर्थिक लोभापायी नागरिक आरोपींच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करताना योग्य खबरदारी घेतली, तर ही फसवणूक टाळता येऊ शकते, असे पोलिसांचे मत आहे.

SCROLL FOR NEXT