वाल्हे, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी तालुका पुरंदरच्या जिरायती वाल्हे भागात शेतकऱ्यांनी बाजरीच्या पेरणीस सुरुवात केली आहे. यंदाही पाऊस कमीच झाला असला तरी आगामी काळात होणाऱ्या पावसाच्या आशेवरच शेतकरी कामाला लागले आहेत.
यंदा वाल्हे परिसरात जुलै महिना निम्मा संपला तरीही पुरेसा पाऊस पडलेला नाही. केवळ गेल्या 8-10 दिवसांत संततधार पाऊस पडला आहे. अल्पशा ओलीवर जिरायत पट्ट्यातील शेतक-यांनी बाजरीच्या पेरण्या केल्या आहेत. भविष्यात पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अद्यापही बहुतांश शेतक-यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. महागडे बियाणे, खते खर्च करून पेरणीनंतर पुरेसा पाऊस न झाल्यास पैसे वाया घालण्याची जोखीम घेण्यास शेतकरी तयार नसल्याचे चित्र आहे. पेरणी लांबल्याने शेतकर्यांचे पूर्ण गणितच बिघडलेले आहे.
बाजरीचे आगार असलेल्या या परिसरामध्ये 1124 हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी केली जाते. मात्र, यंदा 4 जुलैपर्यंत फक्त 30 टक्के म्हणजे 337 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. दमदार पावसाअभावी अनेक शेतकरी बाजरी पेरावी की नंतर उसाची लागवड करावी, या द्विधा मनःस्थितीत आहेत.
मागील दोन-तीन वर्षांपासून बाजरीचे क्षेत्र कमी होऊन उसाचे क्षेत्र वाढत आहे. यंदा वाल्हे महसूल मंडळत फक्त 50 मि.मी. पाऊस झाला आहे. तसेच मागील वर्षीपेक्षा बाजरीच्या क्षेत्रापैकी फक्त 30 टक्के (337 हेक्टर) इतक्याच क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
– गीता पवार, कृषी सहायक