इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : येथील मुख्य बाजारपेठेत पावसाच्या पाण्याची डबकी साचली आहेत. त्यामुळे बाजारपेठेत येणार्या ग्राहकांना चिखल तुडवत खरेदी करावी लागत असून, परिसरात डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
परिसरात गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील मुख्य बाजारपेठेत पावसाच्या पाण्याची डबकी साचली आहेत. बाजारपेठेतील रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने व्यावसायिक व नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत आहे.
खाऊ गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. त्यामुळे चहा, वडापाव, भेळ सेंटरवर येणार्या ग्राहकांना चिखलात उभे राहून चहा- वडापावचा आस्वाद घ्यावा लागत आहे.
बाजारात साचलेल्या डबक्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ लागली असून, व्यापार्यांसह ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, यामुळे नागरिक बाजारपेठेत जाणे टाळत आहेत. परिणामी बाजारपेठेतील उलाढालीवर विपरीत परिणाम होत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने मुरूम टाकून पाण्याच्या डबक्यामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्याची मागणी व्यापार्यांसह नागरिकांनी केली आहे.