पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा प्रशासनाने पुणे-मिरज आणि बारामती-लोणंद या दोन रेल्वेमार्गांसाठी मागील चार महिन्यांत दीडशे एकर भूसंपादन केले आहे. आत्तापर्यंत एकूण 233 एकर भूसंपादन झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. या खरेदीसाठी 238 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, त्यातील 112 कोटी खरेदीसाठी खर्च झाले आहेत, तर उर्वरित 233 एकर जमीन खरेदीसाठी शिल्लक असलेला 126 कोटी रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. शेतकर्यांना सध्याच्या बाजारभावापेक्षा पाचपट अधिक दर देण्यात आला आहे.
बारामती-फलटण-लोणंद नवीन एकेरी रेल्वे मार्गांची लांबी 63.65 किमी असून, त्यापैकी 37.20 किमी रेल्वेमार्ग बारामती तालुक्यातून जातो. या तालुक्यातील 13 गावांमधील खासगी भूसंपादन केले जात आहे. या जमिनींचे दर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठरवले आहेत. प्रकल्पासाठी 438 एकरपैकी 205 एकर जमीन थेट खरेदीने संपादित झाली आहे. पुणे-मिरज या ब्राॅडगेज लाईनसाठी जिल्ह्यातील आतापर्यंत 28 एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे.
त्यामुळे प्रक्रिया गतीने
या जमिनींचे संपादन करताना जमिनीचे दर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील दरनिश्चिती समितीने निश्चित केले आहेत. शेतकर्यांना व जमीनमालकांना राजी करण्यासाठी एक पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार, जमीनखरेदीची प्रक्रिया गतीने झाल्याची माहिती भूसंपादन उपजिल्हाधिकारी राजेश साळुंके यांनी दिली.