पुणे; पुढारी वृत्तसेवा: सण साजरे करत असताना सामान्य माणसाला भेडसावणार्या महागाईचा विचार करणेही गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील सरकारला महागाई कमी करण्याची सुबुध्दी दे, अशी प्रार्थना आपण विघ्नहर्त्या गजाननाकडे केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पटोले यांनी गुरुवारी शहरातील गणपती मंडळांना भेट दिली. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "कोरोनामुळे गेली दोन वर्षे आपण धर्म, संस्कृती या सगळ्यापासून दूर होतो. मात्र, प्रत्येकजण आज गणेशोत्सव साजरा करत आहे. आपल्या प्रत्येकासाठी हे आनंदाचे दिवस असतात, परंतु सण साजरे करताना सामान्य माणसाला भेडसावणार्या महागाईचा विचार करण्याची गरज आहे.
त्यामुळे केंद्र आणि राज्यातील सरकारला महागाई कमी करण्याची सुबुध्दी दे, अशी प्रार्थना मी विघ्नहर्त्या गजाननाकडे केली आहे. देशात सर्वाधिक महागाई आपल्या राज्यात आहे. महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळायला हवा." भाजपा नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी सुरू असलेल्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले, "हेच लोक पूर्वी दहा वेळा मातोश्रीवर जात होते. त्यामुळे कोण कुणाला भेटते आणि कोण कुणाचा मुडदा पाडतो, हे आपण बघतच आलो आहे. त्यामुळे मी यात पडणार नाही."