देऊळगाव राजे, पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावरील मोठ्या प्रमाणातील पावसामुळे भीमा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. दौंड येथून गुरुवारी सकाळी तब्बल 73 हजार क्युसेस वेगाने पाणी वाहत होते. देऊळगाव राजे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावरून पाणी वाहत असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेटला जाण्याचा रस्ता बंद झाला आहे.
प्रचंड पाण्यामुळे बंधार्यावरून पाणी वाहत असल्याने या भागाचा गुरुवारी सकाळपासून संपर्क तुटला आहे. पुरामुळे नदीकाठच्या सखल जमिनीत पाणी गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांचे विद्युतपंप पाण्यात बुडून नुकसान झाले आहे. मात्र, सुखद बाब म्हणजे परिसराला वरदान असलेले उजनी धरण वेगाने भरत आहे.
मृत साठ्यात गेलेले हे धरण दोनच दिवसात जवळपास 10 टक्के भरले आहे. पाण्याची अशीच आवक राहिली तर लवकरच हे धरण 100 टक्के भरेल. एकूणच प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असली तरी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनीही योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.