मंचर, पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकरला जाणार्या पोखरी घाटाची जुजबी दुरुस्ती न करता कायमस्वरूपी घाट रस्ता आणि डोंगर कपारीतील दगड रस्त्यावर येऊ नये, यासाठी संरक्षक लोखंडी जाळी लावावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने लावून हा रस्ता मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे.
सलग आठवडाभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात रविवारी (दि. 10) संध्याकाळी अचानक दरड कोसळल्याने हा रस्ता काही वेळापुरता वाहतुकीसाठी ठप्प झाला होता. दरड थोड्या प्रमाणात कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जीवतहानी झाली नसली, तरी नुकतेच नवीन डांबरीकरण केलेला हा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला आहे, तसेच अजून चार ते पाच ठिकाणी दरड कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.
पोखरी घाटात दरवर्षी दरड कोसळत असून हा घाट पावसाळ्यात प्रवास करण्यासाठी धोकादायक होत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करून धोकादायक दरडी काढून टाकाव्या, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी केली आहे.