पुणे

पुणे : हवामानाचा अंदाज घेत दुपारी चार वाजण्यापूर्वी परतीच्या मार्गाला लागा

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील गड-किल्ले, पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत, परंतु पर्यटकांनी निसर्गरम्यस्थळी गेल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच हवामानाचा अंदाज घेत दुपारी चार वाजण्यापूर्वी परतीच्या मार्गाला लागा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात पर्यटनांची संख्या मोठी असून, शहरासह राज्यातील व परराज्यातील पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी पुणे जिल्ह्यात येतात.

पावसाळ्यात नदीकाठची गावे, धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील ठिकाणे, गड-किल्ले, पर्यटन स्थळे, डोंगरातून कोसळणारे धबधबे अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन प्रत्येकवेळी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सूचना दिल्या जातात. या सूचनांचे पर्यटकांना पालन करावे लागेल, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्यांदाच पर्यटनासाठी जाणार असाल आणि त्या ठिकाणी पाऊस, दाट धुके असेल तर स्थानिक गावातील एखादा मार्गदर्शक सोबत घ्यावा. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने दाट धुके असल्यास गाडीचे दिवे आणि पार्किंग दिवे चालू ठेवून गाडी चालवावी. पर्यटनस्थळी सुरक्षारक्षक भिंती, लोखंडी कडे नसल्याने धबधब्याच्या प्रवाहात उतरू नये, सर्व पर्यटकांची सायंकाळी चार वाजण्यापूर्वी परतीच्या प्रवासाला लागावे. रस्ते अरुंद असल्याने आपली वाहने रस्त्यावर लावू नयेत.

अपघात टाळण्यासाठी घ्या काळजी
माळशेज घाट परिसरात अनेक धबधबे असून, धबधब्याच्या पाण्यात उतरल्याने किंवा घाटात अपघात होण्याची शक्यता आहे. वेल्हा ते मढेघाट रस्ता डोंगर दर्‍यांमधून जात असून, वेडीवाकडी वळणे, तीव्र उतार आणि चढ असणारा हा रस्ता आहे. तसेच मढेघाट ते वेल्हा या परिसरामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून, दाट धुके असते. अशा ठिकाणी दुर्घटनांची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पर्यटकांनी जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT