भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा: डोणगावातील 10 शेतकर्यांची भातरोपे व लागवड झालेली भातशेती वन्यजीव विभागाने सोडलेल्या गव्यांनी खाऊन नुकसान केले आहे. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या आदिवासी शेतकर्यांनी दिला आहे.आदिवासी भागातील आहुपे- डोण या अभयारण्य परिसरातील भातशेतीत रानडुकरे, गवे व वानर आदी वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. भात, वरई, सावा, नाचणी, तूर, हुळगे आदी पिकांचे हे जंगली प्राणी नुकसान करत आहेत. नुकसानीत लागवडयोग्य भात रोपांचेही अर्धवट खावून नुकसान केले आहे.
डोण येथील आदिवासी शेतकरी मारुती शंकर गवारी, सोमनाथ मारुती गवारी, गणपत रामा गवारी, सोमनाथ मारुती गवारी, नामदेव महादू गवारी, सोमनाथ रामा गवारी, सखाराम भिका गवारी, देवजी सखाराम गवारी, दत्तात्रय मोतीराम गवारी, कृष्णा महादू गवारी यांची भातरोपे तसेच काही शेतकर्यांची भातशेती गव्यांनी खाल्ली आहे. परिणामी शेतकरी पूर्णत: उदध्वस्त झाले आहेत. भागातील शेतकर्यांची उपजीविका भातशेतीवरच असून, नुकसानीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वन्यजीव विभागाने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी आदिवासी शेतकरी समाजातर्फे केली आहे.