बावडा, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारने नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यासाठी यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने घातलेल्या अनेक जाचक अटी नवीन जीआर काढून दूर केल्या आहेत. त्याचा राज्यातील 14 लाख शेतकर्यांना लाभ मिळणार असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. 8) सांगितले.
निरवांगी येथील प्राचीनकालीन नंदिकेश्वर मंदिरात हर्षवर्धन पाटील यांनी दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या जाचक अटीमुळे लाखो शेतकरी 50 हजारांच्या अनुदानापासून वंचित राहणार होते. मात्र, ही बाब आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून दिली. नवीन जीआर काढल्याने इंदापूर तालुक्यातील हजारो शेतकर्यांचा फायदा होणार आहे. इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी भाजप-शिवसेना सरकारकडून दिला जाईल.
सत्तेवर असताना 20 वर्षांत कधीही कोणावर अन्याय केला नाही. मात्र, इंदापूर तालुक्यात गेल्या अडीच वर्षांत जनतेवर, कार्यकत्र्यांवर वेगवेगळ्या माध्यमातून अन्याय झाला. राज्यात भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे आता कोणावरही अन्याय होणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. निरवांगी, दगडवाडीसाठी निधी कमी पडणार नाही; तसेच तालुक्यात शेतीला पाणी कमी पडू देणार नाही, असे भाषणात स्पष्ट केले. या वेळी दशरथ पोळ, महादेव कवितके यांनी मनोगत व्यक्त केले.