पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत राज्य सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, मात्र आपण त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही,' असे स्पष्टीकरण भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिले आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची सत्ता आली आहे. सत्ता बदलानंतर सरकार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागणार, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलताना वाघ म्हणाल्या, 'महिला आयोगाचे पद रिक्त न ठेवता कोणीतरी त्या ठिकाणी काम करतंय, हे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. मात्र, राज्य सरकार बदलल्यानंतर विविध पदांवर नवीन व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या जातात. त्यानुसार राज्य सरकार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबतही निर्णय घेईल. मात्र, कोणी म्हणत असेल मी पद सोडणार नाही, तर ते चुकीचे आहे.' माजी मंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात वाघ म्हणाल्या, 'राठोड यांच्याविरुद्ध सुरू असलेला माझा लढा सुरूच राहणार आहे. राठोडच्या विरोधात मी स्वतः न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
त्यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी मागणी आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात नोंदविलेला बलात्काराचा गुन्हा आणि त्यांना मिळालेल्या जामीन रद्द करण्याच्या मागणी केली आहे. यासंदर्भात मी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची भेट घेतली आहे.' कोंढवा येथे बसचालकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या घटनेवर बोलताना वाघ म्हणाल्या, 'राज्य सरकारने मुलींच्या बसमध्ये महिला सेवक ठेवण्याचे बंधनकारक केले होते. मग त्या बसमध्ये महिला सेवक होती की नव्हती, संबंधित बस मालकाने नियमाचा भंग केला आहे का, याची माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर बोलणे योग्य ठरेल.'
त्या पीडितेला आम्ही मदत करू
भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर संबंधित महिलेने आरोप केल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा घेतला आहे. संबंधित पीडितेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर मी त्या महिलेची मदत करेन. तक्रार दिल्यानंतर पोलिसही कारवाई करतील. चूक करणार्यांची गय केली जाणार नाही, असेही वाघ यांनी स्पष्ट केले.