खोर, पुढारी वृत्तसेवा : येथील रखडलेल्या पुलाच्या कामामुळे सध्याच्या परिस्थितीत नागरिकांची मोठी कसरत पाहावयास मिळत आहे. संबंधित विभागाने लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
पावसाळ्यात खोरच्या ओढ्याला मोठा पूर येत असतो आणि त्यातच कमी उंची असलेल्या पुलामुळे पूर आलेले पाणी पुलावरून जात होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागत होता. खोर ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार राहुल कुल यांनी स्थानिक निधीची या पुलाच्या कामासाठी तरतूद करून 98 लाख 12 हजार 815 रुपये निधी दिला आहे. त्यानुसार पुलाच्या कामाला उन्हाळ्यात सुरुवातही करण्यात आली. मात्र, स्थानिक महिला व शेतकरीवर्गाचे होणारे नुकसान पाहता हे काम स्थानिक महिलेने बंद पाडले आहे.
आज जवळपास हे अर्धवट स्थितीतील काम गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असून, खोदकाम केलेल्या पुलाच्या बाजूने रस्ता वाहतुकीसाठी तयार केला आहे. पावसामुळे या रस्त्यावर मोठा चिखल व पाणी साठले जाते. परिणामी, नागरिकांची मोठी कसरत होत असते. पुलाच्या कामाला निधी मिळूनही नागरिकांची चिखलातून पायपीट होत असेल, तर ही मोठी नाराजीची बाब आहे. खोर परिसरातील नागरिकांनी सदर बंद पडलेले काम लवकरात सुरू करण्याची मागणी दौंडचे आमदार राहुल कुल व सार्वजनिक बांधकाम विभागाकड़े केली आहे.
याबाबत दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोलले असता, आम्ही सदर स्थानिक महिलेशी बोलणी करून हा प्रश्न मिटवणार असून, काम सुरू करणार असल्याचे दोन महिन्यांपासून बोलले जात आहे. मात्र, आजपर्यंत हा तिढा सुटलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला केवळ एका महिलेची समजूत काढून काम मार्गी लावण्यासाठी दोन ते तीन महिने लागणे, ही लाजिरवाणी बाब आहे.