पुणे

पुणे : खानापूरला रस्ता पुरात बुडाला; शेकडो विद्यार्थी, नागरिक तीन तास अडकले

अमृता चौगुले

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम हवेली पानशेत भागात बुधवारी (दि. 13) सकाळपासून अतिवृष्टीचे थैमान सुरू आहे. पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर येथील मणेरवाडी ओढ्यातील पर्यायी रस्ता पुरात बुडाल्याने पानशेत, पश्चिम हवेली भागातील शंभराहून अधिक गावांचा संपर्क तुटून विद्यार्थी, पर्यटकांसह शेकडो नागरिक तब्बल तीन तास अडकून पडले होते. दोन्ही बाजूला दोन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, दुपारी तीनच्या सुमारास पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने पर्यायी रस्त्यावरील पुराचे पाणी ओसरले. त्यानंतर कशीबशी वाहतूक सुरू झाली.

स्थानिकांच्या सतर्कतेने दुर्घटना टळली

माजी सरपंच शरद जावळकर व स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधानता दाखवत वेगाने पाणी वाहत असलेल्या पर्यायी रस्त्यावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली.कोट्यवधी रुपये खर्च करून पानशेत रस्त्याचे काम करण्यात आले आहे; मात्र खानापूर येथील पुलाचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यायी रस्ता बुडून संपूर्ण परिसराचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे, असे वृत्त दै. 'पुढारी' ने यापूर्वीच दिले होते.

खानापूर येथील मणेरवाडी ओढ्यावरील पुलांचे काम अनेक महिने अर्धवट असल्याने पुलालगत ओढ्यात केलेल्या कच्चा पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. दोन दिवसांपासून या रस्त्यावरून पाणी वाहत आहे. बुधवारी सकाळी पाण्यात बुडालेल्या या धोकादायक रस्त्यावरून नागरिक ये जा करीत होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्रचंड पाऊस पडल्याने जवळपास दहा मीटर अंतराचा रस्ता बुडाला.

रस्त्यावरून ये जा करणारी वाहने पुरात वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी धाव घेऊन वाहतूक बंद केली. पूरपरिस्थितीमुळे वाहतूक बंद होऊनही घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम तसेच इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी आले नाहीत.
पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगवानराव पासलकर यांनी दुपारी खानापूर पुलाची पाहणी केली. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पर्यायी रस्तावरील वाहतूक धोकादायक आहे. नवीन पुलावरून होणारी वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी बांधकाम खात्याने खबरदारी घ्यावी, अशी मागणी पासलकर यांनी केली आहे.

बुधवारी दुपारच्या पूरस्थितीमुळे खानापूर येथील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने युध्दपातळीवर सुरू केले आहे. पुलाचा स्लॅब पूर्ण झाला आहे. दोन्ही बाजूला भराव टाकून पुलावरून आजच वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. पुराच्या लोंढ्यात नवीन पुलाची हानी होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्या आहेत.

                                                    – ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सा. बां. विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT