जेजुरी, पुढारी वृत्तसेवा : पाणी पंचायत खळद व ग्रामपंचायत कोथळे यांच्या संयुक्त विद्यमाने कोथळे ग्रामपंचायत हद्दीत सुमारे 22 एकर क्षेत्रात वनराई साकार होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या क्षेत्रात 250 विद्यार्थ्यांच्या मदतीने एक हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी कोथळे ग्रामपंचायतीने घेतली आहे.
कोथळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत जगतापवस्तीजवळील 22 एकर जागेवर कंपाउंड करून ठिबकच्या साहाय्याने या वृक्षांचे संगोपन केले जाणार आहे. या ठिकाणी विविध वृक्षांची लागवड करून देवराई करण्याचा मानस या वेळी सरपंच शहाजी जगताप यांनी व्यक्त केला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अभिजित जगताप, श्यामकांत जगताप, दत्तात्रय भोईटे, रामदास जगताप, किशोर जगताप, ग्रामसेवक रवींद्र पिसे, पाणी पंचायतचे प्रतिनिधी योगेश मगर, विद्या महामंडळ प्रशालेचे मुख्याध्यापक एकनाथ देवकर आदी उपस्थित होते.