भामा आसखेड, पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील आंबेठाण व कोरेगाव खुर्द या दोन गावांत 4 लहान मुले खड्ड्यात पडून त्यांचे जागीच मृत्यू झाले आहेत. परिणामी, गावच्या परिसरात किंवा घराजवळ तसेच खोल्यांची चाळ असलेल्या ठिकाणचे खड्डे मोठी समस्या बनले आहेत. संबंधितांनी ते पावसाळ्यापूर्वी बुजविणे आवश्यक आहे.
सध्या पावसाळ्यात जोरदार पावसाने गटारात, घराजवळ व खोल्यांच्या चाळीजवळ असलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचले आहे. घराजवळ किंवा चाळीजवळ असलेले खड्डे लहान मुलांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. खेड तालुक्याच्या एमआयडीसी क्षेत्रात स्थानिक नागरिकांनी नियमबाह्य खोल्यांच्या चाळी बांधल्या आहेत. कंपनीतील कामगार याच खोल्यांमध्ये कुटुंबासमवेत भाड्याने राहतात. ज्यांनी खोल्यांच्या चाळी बांधल्या आहेत, त्यांनीही चाळीच्या आजूबाजूचे खड्डे शोधून बुजविले पाहिजेत.
आंबेठाण गावच्या लांडगेवस्ती परिसरातील खड्ड्यात पडून सख्ख्या तीन लहान भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना 12 जुलै 2022 रोजी घडली होती. ही घटना ताजी असतानाच कोरेगाव खुर्द येथील माळवाडीत कुडूसकर कुटुंबाने शौचालय बांधण्यासाठी खोदलेल्या शोषखड्डयांत त्यांच्याच घरातील तीन वर्षाची गाथा ही मुलगी पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.16) घडली.
दोन्ही घटनांत मुलांचा खेळत-खेळत पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. लहान मुलांना धोका होऊ नये म्हणून नागरिकांनी आपल्या घराजवळ किंवा खोल्यांच्या चाळ परिसरात खोदलेले खोल
खड्डे असल्यास तत्काळ बुजवून टाकावेत.– संघमित्रा नाईकनवरे, सरपंच, आंबेठाण