नानगाव : पुढारी वृत्तसेवा : पारगाव सा. मा. (दौंड) येथील पीरबाबा वास्तूच्या बांधकामावरून गेले अनेक दिवस वातावरण तापले होते. मात्र, यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मध्यस्थीने गेल्या अनेक दिवसांपासून तापलेला हा प्रश्न सुटला. पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथील पीराच्या माळावरील पीरबाबा वास्तूच्या बांधकामावरून गावातील वातावरण तापले होते. गावातील प्रश्न गावातच ग्रामस्थांच्या उपस्थितीत, एकमेकांच्या विचाराने सुटावेत, अशी भूमिका पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी गुरुवारी (दि. 4) विठ्ठल मंदिरात घेतलेल्या सभेत मांडली.
पीराच्या माळावर पीरबाबा वास्तूचा जीर्णोध्दार करताना ती मोठी करीत चारही बाजूला मोठे दरवाजे करण्यात आले. घुमट व मिनाराची उंची देखील वाढविण्यात आली होती. पूर्वी ही वास्तू छोटी होती आणि पूर्वाभिमुख छोटा वाकून जाण्याइतका दरवाजा होता. छतावरील मिनार व घुमट देखील छोटे होते. वास्तूच्या याच जीर्णोध्दारावेळी केलेल्या बदलाने पेच निर्माण झाला होता. गावातील हिंदू धर्मीयांच्या मते पूर्वीप्रमाणेच वास्तूचे काम होणे गरजेचे होते, तर मुस्लिम धर्मीयांच्या मते झालेले काम हे च़ांगले झाले असून, एखाद्या वास्तूचा जीर्णोद्धार करताना थोडेफार बदल करण्यात आले आहेत. मात्र, दरवाजे व मिनार यावरूनच प्रामुख्याने वाद निर्माण झाला होता.
दि. 27 जुलै रोजी झालेल्या ग्रामसभेत या विषयावर ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील हिंदू धर्मीय नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले होते. या वेळी ग्रामसभेत ग्रामपंचायत प्रशासनाकडून पीराच्या वास्तूचे तीन दरवाजे बंद करून एकच दरवाजा ठेवला जाईल, असे सांगण्यात आल्यावरच पुढे ग्रामसभा सुरू झाली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पीराच्या वास्तूजवळ वाळू, विटा आदी साहित्य दरवाजे बंद करण्यासाठी टाकण्यात आल्यावर मुस्लिम बांधवांनी यासंदर्भात यवत पोलिसांना निवेदन दिले होते.
पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी पीराच्या वास्तूची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी पवार यांनी सध्या या ठिकाणी कोणीही कोणतेही काम करू नये, असे आवाहन केले होते. दि. 4 ऑगस्ट रोजी पवार यांच्या उपस्थितीत गावातील सर्वधर्मीयांची बैठक पार पडली. तीन-चार तास चाललेल्या या बैठकीत अखेर तोडगा निघाला. यामध्ये एक दरवाजा व तीन बाजूंना तीन खिडक्या होतील व हे काम ग्रामपंचायत प्रशासन करून घेईल, असे ठरले.