खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरण भागात बिबट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे. धरण परिसरातील माणगाव येथे बिबट्याने बाळु तुकाराम बामगुडे यांच्या बैलाचा फडशा पाडला. या भागात पाच ते सहा बिबट्यांचे वास्तव्य असल्याने पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. कडक उन्हामुळे जंगलात खाद्य, पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बिबटे, तसेच हिंस्र वन्यप्राणी गाई, बैल अशा जनावरांचा फडशा पाडत आहेत. गेल्या दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात दहाहुन अधिक जनावरे ठार झाली असल्याचे शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ यांनी सांगितले.
बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याने शेतकर्यांत घबराट पसरली आहे. सह्याद्रीच्या दुर्गम डोंगर रांगातील टेकपोळे, माणगाव, शिरकोली परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत दहाहुन अधिक गाई, म्हशी, वासरे बैल अशा जनावरांचा हल्ल्यात मृत्यू झाला. पानशेत वनविभागाच्या वनपरिमंडल अधिकारी वैशाली हाडवळे म्हणाल्या, संबंधित शेतकर्याला भरपाई देण्यात येणार आहे त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
हेही वाचा