येळसे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा वाढला असून, धरण 98.86 टक्के भरले आहे. मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरासाठी ही आनंदवार्ता आहे. पवना धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे गुरुवार (दि. 11) दुपारपासून विद्युतनिर्मितीद्वारे (हायड्रोद्वारे) 1400 क्युसेकने, तर रात्री दहा वाजता सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून 2100 क्युसेक असा एकूण 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग पवना नदीपात्रात सुरू आहे.
मात्र, शनिवारी (दि.13) धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे तसेच पवना पाणलोट क्षेत्रात पाण्याचा येवा जास्त असल्यामुळे धरणातून शनिवारी रात्री 9 वाजल्यापासून 2000 क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला आहे. तर दरवाजे एक फुटाने उचलून सांडव्यावरून 4100 क्युसेक व विद्युतनिर्मितीद्वारे 1400 क्युसेक असा एकूण धरणातून 5500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सरू आहे, अशी माहिती पवना पाटबंधारे उपअभियंता अशोक शेटे यांनी दिली.
मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहरासाठी वरदान ठरलेले मावळातील मुख्य धरण असलेले पवना धरण 98.86 टक्के भरले आहे. धरण परिसरात शनिवारी दिवसभरात 25 मिमी पावसाची नोंद झाली असून, 1 जूनपासून 2029 मिमी पाऊस पडला आहे.
मागील वर्षी आजच्या तारखेला 94.17 टक्के पाणीसाठा शिल्लक होता, तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच चालला आहे. पाणलोट क्षेत्रात पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. तरी पवना नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शेटे यांनी केले आहे.