सिंहगड रस्ता : पुढारी वृत्तसेवा: पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीवरच थेट 12 इंचाची दुसरी जोडणी घेतल्यान धायरी आणि आसपासच्या परिसरातील पाणीटंचाईची समस्या निकाली निघाली आहे. भविष्यातदेखीले डीएसके विश्व, बेनकर वस्ती, चव्हाण बाग, धायरेश्वर मंदिर, धायरी गावठाण, लायगुडे वस्ती, पोकळे वस्ती, रायकर मळा, जाधवनगर या धायरीतील भागात पाणीटंचाई होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता व्यंकटेश पाटील यांनी बुधवारी दिली.
सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील धायरी भागात दर वर्षीप्रमाणे यंदाही उद्भवलेल्या पाणीटंचाईच्या समस्येमुळे धायरीकर हैराण झाले होते. प्रशासनाकडे विनंती पत्रे, तक्रारी करूनदेखील पाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी प्रशासनावर केला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने धायरीकरांसाठी तातडीने पावले उचलताना समस्या मार्गी लावली. साधारणपणे मे महिन्याची शेवटी आणि जून महिन्यात खडकवासला धरणातील पाणीपातळी खाली जाते. जोपर्यंत धरणात पर्याप्त पाणीसाठा आहे, तोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहतो.
मात्र, पाणीपुरवठा करणारी 3000 मिमी व्यासाची जलवाहिनीच्या पातळीपेक्षाही पाणीसाठा खाली गेल्याने या भागात पाण्याची टंचाई निर्माण होत असते. त्यावर उपाय म्हणून 2500 मिमीच्या जलवाहिनीवर 12 इंचाची नवीन जोडणी करून थेट या भागाच्या मुख्य विहिरीत जलवाहिनीचा जोड देण्यात आला आहे. यामुळे धरण क्षेत्रात पाणी कमी झाले तरी या भागाला पाण्याची समस्या उद्भवणार नाही. स्थानिक माजी नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे म्हणाल्या, 'प्रशासकीय पाठपुरावा करीत पाणीटंचाई प्रश्न मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर काम करून घेण्यात आले. भविष्यात या भागातील नागरिकांना पाणी समस्या उद्भवण्याची शक्यता नगण्य आहे.'