कोंढवा : संततधार पावसामुळे मिठानगर परिसरातील लहान रस्त्यांना नदीचे स्वरूप येत आहे. पाण्याखालील तुटलेले चेंबर धोकादायक बनले आहेत. महापालिका प्रशासनाला अनेकदा माहिती देऊनही उपाय योजले जात नसल्याने महापालिकेवर परिसरातील नागरिकांसमवेत आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा माजी नगरसेवक गफुरभाई पठाण यांनी दिला. कोंढवा खुर्द-मिठानगर या दाट लोकवस्तीच्या भागात उंचवट्यावरून पाणी वेगाने खाली वाहते. त्यामुळे लहान गल्ली मध्ये पाणी साचते.
मिठानगर मुख्य रस्त्यावरील चेतना गार्डन सोसायटीसमोरील ड्रेनेजचे झाकण तुटून संपूर्ण दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. वार्ड ऑफिसरकडे माजी नगरसेवक तक्रारी करतात, पण त्या सोडविल्या जात नाहीत. मिठानगर, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, साईबाबानगर या परिसरातील विविध प्रश्न व पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत पठाण म्हणाले की, कोंढव्यातील विविध प्रश्नावर मी लेखी व तोंडी अनेक तक्रारी प्रशासनाकडे दिल्या. येत्या दोन दिवसांत प्रशासनाने कामे मार्गी लावली नाहीत, तर प्रशासनाला जाग आणण्यासाठी आक्रोश मोर्चा पालिकेवर घेऊन जाणार आहोत.